सोमवार, 14 जुलाई 2008

हेल्मेट सक्तीविरुद्ध सविनय कायदेभंग

नागपूर, १४ जुलाई-शहरातील दुचाकी वाहनचालकांना हेल्मट घालण्याची सक्ती करण्याचा राज्य सरकारचा निर्णय अयोग्य असल्याचे सांगत, या निर्णयाविरुद्ध आपण सविनय कायदेभंग करणार असल्याचे भाजप आमदार देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
२००३ मध्ये राज्य सरकारने हेल्मेट सक्तीचा आदेश काढला होता. मात्र महापालिका क्षेत्रात कॉमन सर्वानाच असा आदेश काढणे चुकीचे आहे, असे फडणवीस यांचे मत आहे. मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम १२९ नुसार आयएसआय ट्रेडमार्कचे हेल्मेट वापरण्यास सांगण्यात आले आहे. तरीही हेल्मेट पूर्णपणे सुरक्षा देऊ शकत नाहीत, चांगल्या दर्जाच्या हेल्मेटची किंमत जवळपास १० हजाराच्या घरात आहे, ती सर्वसामान्यांना परवडणारी नाही.
सरकार स्कार्फ वापरण्यावर एकीकडे बंदी आणतेय तर दुसरीकडे संपूर्ण चेहरा झाकेल अशी हेल्मेट वापरण्याचा आदेश देतेय, हे सरकारच्या निर्णयाशीच विसंगत आहे. त्यामुळे या आदेशाचा सविनय भंग करण्याचा निर्णय घेतला आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

अखेर ७०:३० चा घोळ संपला

मुंबई, दि. १५ : अकरावीसाठी ७०:३० अशा जिल्हा निहाय कोटयानुसार प्रवेश देण्याच्या निर्णयाबाबत कोलांटी उडी घेत राज्य सरकारने हा जिल्हा कोट्याचा वादग्रस्त निर्णय स्वत:हून मागे घेतला आहे. मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञा पत्र सादर करुन राज्यसरकारने हा अध्यादेश रद्द करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा घोळ संपण्याची चिन्हे दिसत आहेत.
अकरावीमध्ये प्रवेश देताना महाविद्यालयांनी आपल्या जिल्ह्यातील ७० टक्के आणि बाहेरील जिल्ह्यातील ३० टक्के विद्यार्थ्यांना प्राधान्य द्यावे असा अध्यादेश राज्य सरकारने काढला होता। त्यातच मुंबईत अकरावी प्रवेशाची पहिली फेरी पार पाडल्यानंतर हा आदेश आल्यामुळे महाविद्यालये, पालक व विद्यार्थी गोंधळात पडले होते. या आदेशानुसार ठाणे जिल्ह्यातील अनेक हुशार विद्यार्थ्यांना मुंबईतील नामांकित महाविद्यालयांत प्रवेश मिळवणे अडचणीचे ठरणार होते. त्यामुळे ठाण्यातील नगरसेकव प्रताप सरनाईक आणि सुधीर बर्गे यांनी या आदेशाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती.
त्यावर न्यायालयाने अकरावी प्रवेशाला तात्पुरती स्थगिती देवून प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश राज्यसरकारला दिले होते. त्यानुसार सरकारच्या वतीने काल मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञाद्वारे ७०:३० चा अध्यादेश रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. यंदाच्या वर्षासाठी ही पध्दती लागू होणार नसल्याचे या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थींच्या गुणवत्तेनुसार प्रवेश मिळविण्याचा मार्ग निदान यावर्षी तरी मोकला झाला असल्याने अकरावीसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पाणीपट्टी भरण्यासाठी पालिकेची पश्र्चिम व मध्य रेल्वेला नोटीस

मुंबई, दि. १५ : मुंबईत कमालीच्या पाणीटंचाईने मुंबईकरांच्या तोंडचे पाणी पळाले असताना पाण्याचा हवा तसा वापर करून त्याची कोट्यवधी रुपयांची पाणीपट्टीही न भरणाऱ्या पश्र्चिम व मध्य रेल्वेला यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेने नोटीस बजावली आहे.
गेल्या महिन्यात पालिका आयुक्त जयराज पाठक यांनी स्वत: पश्र्चिम आणि मध्य रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालकांना पाणीपट्टी भरण्यासंबंधीचे छोटेखानी पत्र पाठवले होते. या पत्रात पश्र्चिम रेल्वेवर ४.१० कोटी तर मध्य रेल्वेकडून ३.५० कोटी रुपये येणे बाकी असल्याचे सांगितले। मात्र अद्याप दोन्हीही रेल्वेकडून बिलाची रक्कम आलेली नाही. पालिकेकडून पश्र्चिम आणि मध्य रेल्वेच्या रेल्वे स्थानक, कारशेड आणि स्टाफ क्वाटर्सला पाणी पुरवठा केला जातो. मात्र आत्तापर्यंत एकदाही या दोघांनी पाणी बिलाची रक्कम अदा केलेली नाही. त्यामुळे निर्धारित करून दिलेल्या वेळेत पश्र्चिम आणि मध्य रेल्वेकडून पाणीबिल भरले न गेल्यास पाणी पुरवठा रद्द करण्यात येईल असा इशारा जल अभियंता एम. एम. कांबळे यांनी दिला आहे.
तर भाजपाचे उत्तर मुंबई महासचिव विनोद शेलार यांनी रेल्वेचे मालाड, कांदिवली आणि दहिसर या तीन ठिकाणी क्वाटर्स असून येथे दर दिवशी १०० टॅंकर पाणी पुरवठा करतात. मात्र सध्या मुंबईत असलेल्या पाणी टंचाईमुळे या परिसरातही १०० पाण्याचे टॅंकर्स पुरेसे ठरत नाहीत. जर रेल्वेने पाणी पुरवठा करणे रद्द केल्यास भाजपानेते आणि माजी केंद्रीय रेल्वे मंत्री राम नाईक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे.

गुन्हेगारी जगताने घेतला सांकेतिक भाषेसाठी आयपीएलचा आधार

मुंबई, दि. १५ : भारतीय बॅटवर विसंबून राहू नका...चांगल्या परिणामासाठी सिझन बॅट वापरा....संपूर्ण संघाला बाद होऊ देऊ नका...केवळ छक्के मारत रहा...एका मागोमाग चौकारांचा पाऊस पडू द्या...अंपायरपासून विशेषत: तिसऱ्या अंपायरपासून सावध रहा तसेच कोणताही अपघात होण्यापासून सावध रहा... हे वाचून तुम्हाला गॅरी कस्टर्न तर भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंना टिप्स तर देत नाही ना असे वाटेल पण तसं काहीही नसून हे सर्व काही गुन्हेगारी जगतावर अधिराज्य करणाऱ्या गॅंगस्टर्सचे बदललेली सांकेतिक भाषा अर्थात कोड वर्ड आहेत.
गुन्हेगारी जगतावर अधिराज्य करणाऱ्या गॅंगस्टर टोळ्यांनी आपली सांकेतिक भाषा बदलली आहे। मुंबई पोलिसांच्या हाती सापडू नये यासाठी आपली सांकेतिक भाषा बदलून टाकली आहे.
खोका-पेट्यांची जागा "कान' आणि पेटीची "जागा' हाताने घेतली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने नुकत्याच काही फोन टॅपिंगद्वारे ही सांकेतिक भाषा टॅप केली आहे. विशेष म्हणजे गुन्हेगारी जगताने आपल्या सांकेतिक भाषेसाठी नुकत्याच झालेल्या अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या आयपीएल क्रिकेट सामन्यातील भाषेचा वापर समाविष्ट केला आहे. गुन्हेगारी जगताने आपली सांकेतिक भाषा बदलण्याचा प्रयत्न केला आहे. पूर्वीच्या सांकेतिक भाषेत टपका डाल ऐवजी आता आऊट, छक्का मार दे ऐवजी हिट द सिक्सर, पांडू से बचके रहेना ऐवजी अम्पायर देख रहा हैं, देसी घोडाऐवजी इंडियन बॅट तर सिझन बॅटचा अर्थ एके-४७ असा होतो (यापूर्वी झाडू वापरायचे).
तर षटकार मारू नको असे कोणत्या गॅंगस्टर टोळीकडून आपल्या सहकाऱ्याला सांगण्यात येते म्हणजे केवळ त्या व्यक्तीला धमकावणे, ठार करणे नव्हे। चौकारचा अर्थ बुलेटचा धाक दाखवणे वा त्याच्या गाडीला अपघात घडवून आणणे असा असून षटकारचा अर्थ ठार मारणे. तसंच अम्पायरचा गुन्हेगारी भाषेतील अर्थ म्हणजे पोलीस आणि थर्ड अम्पायर म्हणजे एन्काऊंटर स्पेशालिस्ट असा होतो. ऍक्सिडंटचा अर्थ अटक होण्याची शक्यता. वाहनांसाठीही गुन्हेगारी जगतात सांकेतिक शब्द आहेत. चार चाकी वाहनांसाठी बकरी, टॅक्सी म्हणजे चुहा (उंदीर). तर एखादा शार्प शूटर मोटारसायकलवरून आला असेल तर त्याचा सांकेतिक शब्द मुर्गी असा ठेवण्यात आला आहे.
पोलिसांपासून स्वत:ला वाचविण्यासाठी गुन्हेगारी जगतात अशा सांकेतिक भाषेचा वापर केला जातो आणि विशेष म्हणजे एकदा का पोलिसांना या सांकेतिक शब्दांचा अर्थ कळल्यास त्या गुंडाचं काही खरं नसतं. त्यामुळे गुन्हेगारी जगतात सतत सांकेतिक भाषा बदलली जाते.

डॅडी, व्ही डोंट मिस यू

गवळी साम्राज्याला अवकळा?
मुंबई, दि. १५ : भायखळा येथील दगडी चाळ आणि त्याच्या आसपासच्या रहिवाशांची सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्र अतिशय दहशतीत जात होती. मात्र जेव्हापासून गॅंगस्टरकडून आमदारकीकडे वळलेल्या डॅडी उर्फ अरुण गवळीला अटक करण्यात आली आहे तेव्हापासून दगडी चाळीतील आसपासचा परिसरच नव्हे तर दगडी चाळ अगदी स्वच्छंद आणि मोकळेपणाने श्वास घेत आहे.
डॅडी उर्फ अरुण गवळीला मोक्कान्वये अटक झाल्यानंतर दगडी चाळीतील दिवस नित्यनेमाने उगवत असेल असं वाटत होतं मात्र गवळीच्या अटकेनंतर येथे सर्व दृश्य बदललं आहे. दगडी चाळीतील पान डॅडीच्या आदेशाशिवाय हलत नव्हते. चाळीतील रहिवाशांना चाळीत राहण्यासाठी वा बाहेर पडण्यासाठी अरुण गवळीची परवानगी घ्यायला लागायची. रात्री ११ वाजल्यानंतर चाळीत कुणालाही परवानगी नाकारली जायची. एखादा रहिवाशी रात्री ११ नंतर घरी आला असेल तर त्याला प्रवेश नाकारला जायचा. एव्हढेच नव्हे तर एखाद्या रहिवाशाचा नातेवाईक रात्री ११ नंतर परतल्यास त्याला आपल्या सामानासह दुसऱ्या दिवशीच्या पहाटे साडेचार वाजेपर्यंत ताटकळत वाट पहात थांबावे लागायचे। उशिरा येण्याची ही शिक्षाच असायची. दगडी चाळीतील या जाचक अटी व नियमांना कंटाळून एखाद्या रहिवाशाला आपले घर विकून दुसरीकडे जावेसे वाटले तर त्याला जोपर्यंत एखादा घर विकत घेणारा मिळत नाही तोपर्यंत तो घर सोडू शकत नव्हता. अन्यथा कुणी विकत घेणारा मिळत नसल्यास मालकाला आपले घर डॅडींच्या एखाद्या नातेवाईकाला नाईलाजाने विकावे लागे. विशेष म्हणजे डॅडीच्या साम्राज्यामुळे बाजारभावाप्रमाणे ही घरे कधीच विकली जायची नाहीत.
डॅडीच्या राज्यकाळात दगडी चाळीच्या मुख्य प्रवेशद्वारावर पहाऱ्यासाठी २-३ सुरक्षा रक्षक होते आणि संध्याकाळी ५.३० वाजताच हे प्रवेशद्वार बंद केले जायचे मात्र जेव्हापासून गवळीला अटक करण्यात आली आहे तेव्हापासून येथे पहाऱ्यावर असलेले सुरक्षा रक्षक गायबच झाले आहेत. दगडी चाळीत कुणीही कसाही, विनाचौकशी प्रवेश करू शकतो. एकूण डॅडीच्या साम्राज्याला अवकळा आली आहे हे खरे.

वसईत भर दिवसा पंधरा लाखांची लूट

वसई, दि.१५ : भर दिवसा ९.३० च्या सुमारास माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील "एव्हरशाईन सिटी' संकुलच्या नाक्यावर वालिव येथील अशोक ऑटोमोबाइल पेट्रोल पंपाची रोख रक्कम घेऊन योणाऱ्या वाहनात शिरून कॅशियरवर हल्ला करीत १५ लाख रूपयांची लूट करण्यात आली. भरदिवसा घडलेल्या या लुटमारीने वाहन चालकांत घबराट पसरली आहे.
भाईंदरच्या मुर्धा व नालासोपाऱ्यातील धानिव येथील दरोड्यांची हवा थंड होते न होते. तोच भरदिवसा दरोड्यांची वर्दळ असलेल्या वसई पूर्वेकडील रेज ऑफिस ते एव्हरशाईन सिटी या रस्त्यावर पंधरा लाखांची लुटमार करीत चोरांनी माणिकपूर पोलिसांना आव्हान दिले आहे. वालिव येथील अशोक ऑटोमोबाईल पेट्रोल पंपावरून वाहन क्र. एम एच ०४ बी जी ४९०० ही लाल रंगाची गाडी पंपावर जमा झालेली पंधरा लाख रूपयांची रोकड बॅकेत जमा करण्यासाठी घेऊन जात होती। गाडीत ड्रायव्हर व कॅशियर या व्यक्तिरिक्त कोणीही नसल्यासने गाडी एव्हरशाईन सिटी नाका येथे आली असता खराब रस्त्यामुळे वाहनाचा वेग कमी झाल्यावर अचानक एक व्यक्ती गाडीत घुसून कॅशियर विष्णुकुमार शर्मा याच्या डोक्यात हातोडा मारला.
अचानक झालेल्या हल्ल्यामुहे ड्रायव्हर हरबंस सिंग शाम सिंग गुज्जर याने गाडी थांबविली असता कॅशियर कडील पंधरा लाख रूपये असलेली बॅग घेऊन चोर पसार झाल्याची तक्रार माणिकपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. घटनेचे गांभिर्य ओळखून अति.पो.अधिक्षक डॉ. शशिकांत महावरकर यांनी माणिकपूर पोलीस ठाण्यात भेट देऊ न घटनास्थळीची पाहणी केली.

ठाण्यात भूकंप रोधक घर बांधण्यासाठी ५६ गवड्यांना प्रशिक्षण

ठाणे, दि। १५ : भूकंपामुळे प्रमुख हानी ही घरांची होत असते. यामुळे मोठी जिवीत हानी होण्याचीही शक्यता असते, त्यामुळे भविष्यात अशा प्रकारची जिवीत हानी होऊ नये यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, धोके आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे नुकतेच ठाणे जिल्ह्यातील ५६ गवड्यांना भूकंप रोधक घरे बांधण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. विशेष महाराष्ट्रात प्रथमच अशा प्रकारचे प्रशिक्षण दिले गेल्याचे बोलले जात आहे. सदर प्रशिक्षण उल्हासनगर तहसिलदार कार्यालय गुरुवार, शुक्रवारी शनिवारी या तीन दिवसात देण्यात आले. यावेळी ठाणे जिल्ह्यातील ५६ गवड्यांना सकाळी १० ते ५ या वेळेत लेक्चर आणि प्रात्यक्षिकपणे प्रशिक्षण देण्यात आले. ठाणे जिल्ह्यातील वाडा, ठाणे, उल्हासनगर, अंबरनाथ, डोंबिवली या तालुक्यातून ५६ जणांची निवड यासाठी करण्यात आली होती। त्यांना प्रशिक्षणासाठी स्वयं शिक्षक प्रयोग या उस्मानाबाद संस्थेच्या प्रा. तबस्सूम आणि काकासाहेब अडसूळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रशिक्षण दिले.
गुरुवारी जिल्हा पुनर्वसन अधिकारी कमलेश सोनाले यांच्या हस्ते या कार्य्रमाचे उद्‌घाटन करण्यात आले. तर समारोप उल्हासनगर तहसिलदार अंजली भोसले यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
याबाबत संबंध प्रकल्प अधिकारी अशोक घुले यांनी सांगितले की, सदर प्रशिक्षण निशुल्क होते. यामध्ये भूकंप रोधकघरे बांधण्याचे नवे तत्रज्ञान शिकविण्याीत आले आहे. या ५६ जणांची ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय संकेत स्थळावर नावे व पूर्ण माहिती उपलब्ध ठेवण्यात येणार आहे. जर कोणास अशा प्रकारे घरे बांधायची झाल्यास या संकेतस्थळाचा उपयोग होईल असेही घुले यांनी सांगितले.

इस्टेट एजंटची हत्या करणारा बिल्डर फरार

मीरा रोड,दि.१५: मीरा रोड येथील बहुचर्चित क्वीन्स पार्कमधील मर्क्युरी अपार्टमेंटमधील लिफ्टच्या तळास गौरव रिजन्सीमध्ये राहणाऱ्या इस्टेट एजंट फिरोज सिकंदर खानचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ माजली होती.
यासंदर्भात मीरा रोड पोलिसांनी कसून तपास केल्यावर सदर प्रकार हत्येचा असल्याचे उघड झाले असून हत्याप्रकरणी बिल्डर नरेंद्र अग्रवाल विरोधात गुन्हा दाखल केला असून महिना उलटून गेल्यावरही सदर बिल्डर फरार असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे।
मीरा रोडच्या गौरव रिजन्सीमध्ये राहणारा फिरोज सिंकदर खान हा इस्टेट एजंट १२ जून रोजी रात्रीच्या सुमारास एका जमिनीच्या व्यवहारासाठी आनंदलाल यास भेटण्यासाठी क्वीन्स पार्कमधील मर्क्युरी अपार्टमेंटमध्ये आला होता. रात्रीपासून फिरोज घरी न आल्याने त्याचा भाऊ इमरान याने फिरोज हरविल्याची तक्रार मीरा रोड पोलीस ठाण्यात दाखल केली. १३ जून रोजी फिरोजच्या हत्येप्रकरणी बोरीवलीचा नामांकित बिल्डर नरेंद्र अग्रवाल याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला. जमिनीच्या संदर्भात फिरोजचे बिल्डर अगरवालबरोबर अनेकवेळा व्यवहार झाले होते. काही दिवसापूर्वी फिरोजने आपल्या आईस जमिनीच्या व्यवहारातून आपणास एक कोटी २२ लाख रुपये मिळणार असल्याचेही सांगितले होते. सदर प्रकरणी १३ जुलै म्हणजेच एक महिना उलटून गेला तरी हत्यारा बिल्डर नरेंद्र अग्रवाल अजूनही फरार असल्याने पोलिसांवर संशय व्यक्त केला जात आहे.

गोदी कामगारांचा 16 जुलैपासून देशव्यापी संप कामगार नेत्यांना चर्चेसाठी दिल्लीत पाचारण

मुंबई, दि. १५: भारतातील प्रमुख बंदरातील बंदर व गोदी कामगारांच्या मागण्यांसाठी गोदी उद्योगातील मान्यता प्राप्त पांच कामगार महासंघाची १६ जुलै पासून देशव्यापी संपाचा इशारा दिल्यामुळे केंद्र सरकारने पाचही महासंघाच नेत्यांना आज दुपारी ११:३० वाजता बोलणी करण्यासाठी दिल्लीत पाचारण केले आहे.
बंदर व गोदी कामागारांना १ जानेवारी २००७ पासून लागू होणाऱ्या वेतन करारापोटी मान्य केलेली १३.५ टक्के हंगामी वाढ, वाढीव बोनस रू. २४००/- ची थकबाकी, १ जानेवारी २००५ पासून ५० टक्के महागाई भत्ता मूळ पगारात सामाविष्ठ करणे, कामगारांची रिक्त पदे भरणे. ओव्हरटाईम पूर्वीप्रमाणे डबलरेटने थकबाकीसह देणे इत्यादी महत्त्वांच्या मागण्यांबाबत पाचही कामगार महासंघाची १ जुलै २००८ रोजी संपाची नोटीस दिली आहे. १० जुलै रोजी दिल्लीत केंद्रीय नौकानयन व परिवहन मंत्री टी.आर.बालू यांच्याबरोबर कामगार नेत्यांची झालेली बोलणी फिसकटल्यामुळे १६ जुलै पासून गोदी कामगारांचा संप अटळ आहे.

न्यूझीलँडमध्ये बत्तीस भारतीय तीर्थयात्री बेपत्ता

वर्ल्ड युथ डे सोहळ्यात पोप यांना बघण्यासाठी सिडनीस निघालेले बत्तीस भारतीय तीर्थयात्री न्यूझीलँड येथे थांब्यादरम्यान बेपत्ता झाले आहेत. भारतातील एक महिन्याचा व्हिसा देण्यात आलेल्या दोनशे वीस तीर्थयात्रीच्या समूहातील हे बत्तीस जण होत.
ऑकलंड येथील कामगार विभागातील अधिकाऱ्यांनी ही माहिती देताना उद्या ऑस्ट्रेलियासाठी रवाना होणार असल्याचे सांगितले. मागील चार किंवा पाच वर्षात भारतीय पुष्कळदा बेपत्ता झाले आहेत.
त्यांचा व्हिसा ग्राह्य असला तरी सर्व तिर्थयात्रींनी योजनेनुसार न्यूझीलँड सोडावे, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे। कायद्याच्या दृष्टीने हे बेकायदेशीर नाही मात्र, हे कृत्य खूपच सर्वसाधारण व निराशाजनक असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
पोप बेनेडीक्ट वर्ल्ड युथ डे कार्यक्रमास गुरूवारी उपस्थिती दर्शवतील. कार्यक्रमात जगभरातून दोन लाख जण सहभागी होतील. सिडनी ऑलिंपिकनंतर येथील सर्वात मोठा सार्वजनिक कार्यक्रम ठरणार आहे.

आयपीएलमधील डोपींगमध्ये मोहम्मद आसिफ दोषी

नवी दिल्ली - पहिल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील खेळाडूंच्या घेण्यात आलेल्या डोपिंग चाचणीत पाकिस्तानचा जलदगती गोलं दाज मोहम्मद आसिफ दोषी ठरला आहे।
स्वित्झर्लंडमधील वाडाच्या (जागतिक डोपिंगविरोधी संस्था) मान्यताप्राप्त संस्थेकडून घेण्यात आलेल्या चाचणीत एका खेळाडूचे नमुने पॉझिटीव्ह आढळल्याचे कळविण्यात आले होते.
तो खेळाडू म्हणजे पाकिस्तानचा मोहम्मद आसिफच असल्याचे बुधवारी आयपीएलच्या प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट करण्यात आले.

माजी सरन्यायाधीश यशवंतराव चंद्रचूड यांचे निधन

मुंबई - भारताचे माजी सरन्यायाधीश यशवंतराव विष्णू चंद्रचूड यांचे सोमवारी पहाटे निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते.
प्रकृतिअस्वास्थामुळे त्यांना बाम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच सकाळी दहाच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर सोमवारी संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सकाळ पेपर्स लिमिटेड, शिक्षण प्रसारक मंडळी, भारतीय विधी संस्था यांचे ते अध्यक्ष होते.

पुण्यात मनसेचा 'राडा' घुमला मराठीचा 'आवाज'

परप्रातींय विद्यार्थ्यांच्या पैशांवर डोळा ठेवून मराठी मुला-मुलींना डावलण्यात येत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सुमारे ४०-५० कार्यकर्त्यांनी शनिवारी दुपारी एमआयटी संस्थेच्या पौड रोडच्या आवारात तोडफोड करत गोंधळ घातला. यात दोन कर्मचारी किरकोळ जखमी झाले. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील गेल्या वेळेच्या सभेत परप्रांतीयांच्या मुद्यावरून शहरातील खाजगी कॉलेजांना लक्ष्य केले होते. त्यानंतर अचानक शनिवारी सकाळी मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी एमआयटीकडे मोर्चा वळवला. त्यात काही मुलीही होत्या. घोषणा देत त्यांनी माईर्स एमआयटीचे कार्यकारी संचालक मंगेश कराड यांच्या कार्यालयावर हल्ला चढवला. मात्र ते ऑफिसमध्ये नव्हते. या ऑफिसमधील काचा, कुंड्या, खुर्च्या, टीव्ही या कार्यर्कत्यांनी फोडले. कराड यांच्या सचिव त्यावेळी कार्यालयात होत्या. त्या, तसेच आणखी एका कर्मचारी या गोंधळात किरकोळ जखमी झाले. सागर राऊत, आशीष तुरे आणि गणेश शिंदे अशी अटक कार्यर्कत्यांची नावे आहेत, अशी माहिती कोथरूड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गौतम देशमुख यांनी दिली.
एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड, मंगेश कराड, तसेच अनेक पदाधिकारी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला गेले असल्याने बरीचशी ऑफिसे रिकामी होती. अर्ध्या तासात या कार्यकर्त्यांनी या ऑफिसेसचा नक्षा बदलून टाकला. मात्र पोलिसांना याबाबत कळवल्याने त्यांनी तिघा जणांना घटनास्थळीच ताब्यात घेतले, असे देशमुख म्हणाले.
घटनेच्या दृष्टीने संपूर्ण देश हा एकात्म असून परप्रांतीयांना प्रवेश न देण्याची भूमिका घेणे कोणत्याच संस्थाचालकांना घेणे शक्य नाही. त्यामुळे एमआयटीवर समाज विघातकांनी केलेला हा हल्ला अतिशय अन्यायी आणि दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे संस्थापक आणि डीन राहुल कराड यांनी दिली.
शैक्षणिक संस्थांनी ९० टक्के स्थानिक आणि १० टक्के परप्रांतीय विद्यार्थी घेणे अपेक्षित असताना एमआयटीमध्ये मात्र प्रवेशाच्या शेवटच्या टप्प्यातही हे प्रमाण नेमके उलटे आहे. त्याच्या निषेधात हे आंदोलन केल्याचे मनसेच्या विद्यार्थी संघटनेचे शहराध्यक्ष किशोर शिंदे यांनी सांगितले. एवढेच नव्हे तर कोथरूड पोलिसांनी काही दिवसांपूर्वी परप्रांतीयांच्या प्रवेशाचे काम करणा-या २० एजंट्सना एमआयटीच्या आवारातच पकडले होते, असेही त्यांनी सांगितले.