शुक्रवार, 27 जून 2008

उत्तरप्रदेशी आणि बिहारी टिसींना हाकलून लावा ः राज ठाकरे

औरंगाबाद - रेल्वेत नव्याने भरती झालेल्या साडेचार ते पाच हजार उत्तरप्रदेशी आणि बिहारी टीसींना बाहेर हाकलून लावा। ही साफसफाई झाल्यानंतर नवनिर्माण करू, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे दिला.
पदवीधर मतदार संघातील पक्षाचे उमेदवार प्रकाश महाजन यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राज ठाकरे शुक्रवारी शहरात आले होते। त्यावेळी त्यांची जाहीर सभा झाली ते म्हणाले,"" या उत्तरप्रदेशी आणि बिहारी लोकांनी येथे येऊन आपले हक्क हिरावून घेतले आहेत. त्यामुळे मराठी तरुणांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. मुंबई आपली भुमीपूत्रांची आहे, त्यामुळे तिथे आलेल्या प्रत्येकाने आपल्याबरोबरीने आपल्या भागातील तरुणांना मुंबईत आणले पाहिजे. मराठी माणसाने आधी राष्ट्राचा विचार केला, मग राज्याचा विचार केला, ही आता चुक झाली असे वाटू लागले.''
संपूर्ण राज्यात परप्रांतीय घुसले आहेत. त्यांना आता रोखले पाहिजे. त्याशिवाय आपल्याला आपले हक्क मिळणार नाहीत, असे आवाहन त्यांनी केले. महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानाच्या समोर ही सभा झाली. सभेला संपूर्ण मराठवाड्यातून युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यापूर्वी क्रांतीचौकातून प्रकाश महाजन यांची प्रचारफेरी काढण्यात आली.

कच्च्या तेलाचा चढता प्रवास सुरूच!

लंडन - डॉलरचे मूल्य अन्य महत्त्वाच्या चलनांच्या तुलनेत घसरल्याने गुंतवणूकदारांनी जोखीम कमी करण्यासाठी कच्च्या तेलाची शुक्रवारी मोठ्या प्रमाणात खरेदी केली। त्यामुळे आशियाई बाजारात कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा भडकल्या आणि कच्चे तेल प्रतिपिंप १४१ डॉलरच्या पुढे गेले.
सत्रातर्गत व्यवहारात कच्चे तेल प्रतिपिंप १४१।७१ डॉलरवर पोचले होते. या आधी सोळा जूनला कच्च्या तेलाने १३९.८९ डॉलर ही उच्चांकी पातळी गाठली होती.
""नजीकच्या भविष्यात कच्च्या तेलाच्या किमती दीडशे ते १७० डॉलर प्रतिपिंपापर्यंत जाऊ शकतात. मात्र, चालू आर्थिक वर्षअखेरपर्यंत कच्च्या तेलाच्या किमती थोड्या खाली येण्याची अपेक्षा आहे,'' असे "ओपेक'चे अध्यक्ष चाकिब खलिल यांनी सांगितले.

महागाईचा निवडणुकीत फटका बसेल-चिदंबरम

नवी दिल्ली- देशातील वाढत्या महागाईचा येणाऱ्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी कॉग्रेस आणि मित्र पक्षांनाही फटका बसण्याची भीती दस्तूरखुद्द अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी व्यक्त केली आहे।
एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत चिदंबरम यांनी ही भीती व्यक्त केली। महागाईदरावर नियंत्रण करण्यात सरकारला अपयश आल्याच्या आरोपांचा मात्र त्यांनी इन्कार केला.
महागाई वाढल्याची बाब जरी खरी असली तरी, सरकार अपयशी ठरल्याचा ठपका लावणे चुकीचे असल्याचे स्पष्ट करत देशातील नागरिक समजदार असल्याने त्यांना महागाईवाढीची नेमकी कारणे माहिती असल्याचे चिदंबरम म्हणाले।
आगामी काळात महागाईदर 10 टक्क्यांच्या आसपासच राहणार असल्याचेही त्यांनी कबूल केले आहे।
महागाईच्या पुरात बाजार गेला वाहून अमेरिकी बाजारात झालेली विक्रमी पडझड, आणि महागाईदराने साडे अकराचा पल्लाही ओलांडल्यामुळे या नकारात्मक प्रवाहात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक शुक्रवारी अक्षरशः वाहून गेला।
सत्राच्या आरंभीच अमेरिकी बाजारात झालेल्या पडझडीचे वृत्त बाजारात येऊन थडकल्याने बाजाराची सुरुवात घसरणीनेच झाली होती। यात बीएसईचा निर्देशांक 620 अंशांनी तुटत दहा महिन्यांनंतर बाजार 14 हजार अंशांखाली आला, तर नॅशनल स्टॉक एक्सेंजमध्येही 179 अंशांची पडझड झाली.
बाजारावर इतका नकारात्मक परिणाम दिसून आला, की शेअर बाजारातील 30 पैकी एकाही कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली नाही।
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती 142 डॉलरच्या जवळपास जाऊन खेटल्याचा परिणामही बाजारावर दिसून आला. यातच महागाईदर वाढल्याने आणि तज्ज्ञांनी तो 12 टक्क्यांपर्यंत जाण्याच्या तयारीत असल्याचे भाकीत केल्याने दलाल स्ट्रीटवर निराशेची लाट आली आहे.

जगातील सर्वात मोठी बासरी

आग्रा - जगातील सर्वात मोठी बासरी बनवण्याचा स्वतः:चाच विश्वविक्रम मोडण्याची तयारी उत्तर प्रदेशातील दिनेश शांडिल्य यांनी सुरू केली आहे।
यापूर्वी त्यांनी पाच फूट लांब आणि साडेतीन इंच व्यासाची तयार करत आधीच आपले नाव ग्रिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नांदवले आहे। आता हा रेकॉर्ड मोडण्यासाठी ते आणखी एक बासरी तयार करत असून त्याची लांबी आणि व्यासही जास्त असेल असा त्यांचा दावा आहे.
आपल्या लहान भावाच्या आणि पत्नीच्या मृत्यूनंतर आपण इतके व्यथित झालो की, त्यांच्या स्मरणार्थ आपण ही बासरी तयार करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबईत गँगवॉर , तीन अटकेत

मुंबई- गँगस्टर करीम लाला याच्या नातेवाईकांवर काल मुंबईत दाऊदच्या तिघा गुंडांनी हल्ला चढवला। यानंतर पोलिसांनी या तिघांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 30 जून पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तारिक, हाजी अमीन आणि यूनूस दुर्रानी या तिघांनी करीम लाला याचा नातेवाईक असलेल्या गुड्डू पठाण याच्यावर काल हल्ला केला। यानंतर हे तिघेही फरार झाले होते. यानंतर पोलिसांनी त्वरित कारवाई करत या तिघांना अटक केली.
यानंतर मुंबईत पुन्हा एकदा गँगवॉर सुरू होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

भारतीय वंशाच्या अमेरिकी महिलेला ११ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

न्यूयॉर्क - गुलामगिरीच्या आरोपावरून भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिक वर्षा सभनानी यांना येथील न्यायालयाने अकरा वर्षांचा तुरुगवासआणि २५ हजार डॉलरचा दंड ठोठावला आहे। सभनानी या ४६ वर्षांच्या असून, अमेरिकीतील लक्षाधीश नागरिकांपैकी एक आहेत.
इंडोनेशियाच्या एका महिलेची पिळवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर होता। तो न्यायालयात सिद्ध झाल्यानंतर न्या. आर्थर स्पॅट यांनी ही शिक्षा सुनावली. शिक्षा सुनावल्यानंतर आपल्या पतीशी आणि मुलांशी बोलताना त्यांना रडू कोसळले. श्री. सभनानी यानाही न्यायालयात शिक्षा सुनावताना आपले अश्रू आवरता आले नाहीत. याच खटल्यात श्री. सभनानी यांनाही नंतर शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
न्यायालयाने खूप कठोर शिक्षा सुनावली आहे आणि त्याविरुद्ध आपण वरिष्ठ न्यायालयात धाव घेऊ, असे बचाव पक्षाच्या वकिलांनी सांगितले. सभनानी कुटुंबीयांचा सुगंधी द्रव्यांचा व्यवसाय आहे. अमेरिकेतील कायद्याप्रमाणे गुलामगिरीच्या १२ निकषांच्या आधारे सभनानी पती-पत्नींना गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच दोषी ठरविण्यात आले होते.

कोल्हापूर- खंडणीसाठी अपहरण करणारे चौघे पोलिसांकडून जेरबंद

कोल्हापूर- दोन लाख रुपयांच्या खंडणीसाठी टेंबलाईवाडी येथील कामकार कंत्राटदार विजय बनसोडे व त्याचा मुलगा राहूल यांचे अपहरण करणाऱ्या सराईत गुंड काळू गायकवाडच्या चार साथीदारांना पोलिसांनी आज नाट्यमरित्या पकडले।
या वेळी पोलिसांवर जांबीयाने हल्ला करण्याचा प्रयत्न काही आरोपींनी केला। पोलिस व आरोपींच्यात झटापट झाली. या संधीचा फायदा घेऊन काळू पसार झाला.
पोलिसांनी विजय व राहूलची सुटका केली आहे. काळूने काल आपल्या साथीदारांसह विजय व त्याच्या मुलाचे अपहरण केले होते. काळू आपल्या साथीदारासह कणेरी मठाजवळील शेतात लपून बसल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तेथे छापा टाकला. तेथे चौघांना पकडले. काळू शेतात पळून गेल्यावर त्याच्या शोधासाठी पोलिसांनी "कॉबींग ऑपरेशन' राबविले, पण काळू सापडला नाही.

मंगळावरील माती, आपल्याप्रमाणेच - संशोधकांचा दावा

लॉस एंजिल्स - नासाच्या "फिनीक्‍स' या अंतराळ यानाने खोदलेल्या मातीच्या नमुन्यांच्या सुरवातीच्या चाचण्यांवरून तेथे "वातावरण' असण्याच्या दाव्याला अनुकूल दिशा मिळाल्याचे अंतराळ संशोधकांनी स्पष्ट केले आहे।
यानाच्या रोबोटिक भुजेने खोदून काढलेल्या मातीच्या नमुन्यांचा यानातील प्रयोगशाळेने केलेल्या परीक्षणाच्या आधारे मंगळावरील माती अपेक्षेपेक्षा अधिक क्षारयुक्‍त आढळल्याचे "नासा'च्या संशोधकांनी सांगितले।
कोणत्याही ग्रहावरील मातीत पोषक तत्त्वे असणे म्हणजे तेथे "जीवन' आहे असा अर्थ होतो, मंगळावर आढळलेली मातीही आपल्या घराच्या आसपास असलेल्या मातीसारखीच आहे, याबाबत मातीचे पूर्ण आणि सखोल परीक्षण करण्याची आवश्‍यकता असल्याचे नासाच्या रसायन विभागाचे प्रमुख्य(तपास) सेम कोनवेस यांनी म्हटले आहे.

"खतरों के खिलाडी' अक्षयचा नवा "अवतार'

मुंबई - बॉलीवुडचा "सबसे बडा खिलाडी' अक्षयकुमार आता आपल्या नव्या लूकमधून प्रेक्षकांसमोर येत आहे। पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या कलर वाहिनीच्या "फिअर फॅक्‍टर- आयडिया खतरों के खिलाडी' या रिऍलिटी शोमध्ये तो आपल्या ऍक्‍शन हिरोच्या इमेजला साजेशा रूपात दिसेल.
टोपी असलेले जॅकेट, गळ्यात "टाय'प्रमाणे स्कार्फ, उंच लांबीचे बुट असा त्याचा वेश असून लंडनस्थित डिझायनरने ते तयार केले आहेत।
नव्या लूक विषयी अक्षय म्हणतो, नव्या स्टाईलला शोभण्यासाठी मला सर्व रंग हवे होते। काहीसा शांत वाटणारे कपड अजिबात नको होते।'
"फिअर फॅक्‍टर -आयडिया खतरों के खिलाडीं' या कार्यक्रमात सर्वोत्तम शारीरीक आणि मानसिक आव्हान असणार आहे। त्यात याना गुप्ता, आदिती गोवरीत्रीकर, पूजा बेदी, सोनाली कुलकर्णी, अनिता हस्नांदणी, मेघना नायडू, तपूर चटर्जी, नेत्रा रघूरामन, अंजना सुखानी, दिपान्निता शर्मा, विद्या माळवदे आणि उर्वशी शर्मा या १३ बॉलीवुड तारका एकमेकांसमोर उभ्या ठाकरणार आहेत।
कार्यक्रमाचे संपूर्ण चित्रिकरण दक्षिण अफ्रिकेत करण्यात आले असून त्यासाठी एक महिन्याहून अधिक कालावधी लागला.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक कोसळला

मुंबई - मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक शुक्रवारी सकाळी ५३६ अंशांनी कोसळून १४ हजारांच्या खाली गेला। गेले काही दिवस बाजारात सुरू असलेली चढउताराची स्थिती आणि जागतिक बाजारांमध्ये असलेल्या अस्थिरतेच्या वातावरणामुळे निर्देशांक कोसळला.
शुक्रवारी सकाळी बाजार सुरू होताच विक्रीच्या माऱ्याने निर्देशांक कोसळू लागला. सकाळी अकराच्या सुमारास निर्देशाक १३,९०८ अंशांवर होता. गेल्या दोन दिवसांतील सत्रांमध्ये निर्देशांकात ३२५ अंशांनी वधारणा झाली होती. त्यापार्श्‍वभूमीवर, शुक्रवारच्या पडझडीमुळे सामान्य गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि इन्फोसिस या दोन्ही शेअरचे भाव कोसळले.