शनिवार, 19 जुलाई 2008

मुंबईच्या युवकाचा आजऱ्यात धबधब्यात बुडून मृत्यू

कोल्हापूर - आजरा येथील रामतीर्थ धबधब्यात पाय घसरुन पडल्याने अनिल गजानन जाधव (वय-२६ मूळ रा. अँन्टाफ हिल, मुंबई. सध्या राहणार, सुभाषनगर) या तरुणाचा शनिवारी दुपारी बुडून मृत्यू झाला.
आपल्या नऊ मित्रांबरोबर जाधव धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी गेला होता. तेथील शेवाळावर त्याचा पाय घसरला. तोल न आवरल्याने त्याचा धबधब्यात पडून मृत्यू झाला. दुपारी बाराच्या सुमारास घटना घडली.

दीड हजार मिस्डकॉल देणारा प्रेमवीर पोलिसांच्या जाळ्यात

मुंबई - प्रेमाला नकार देणाऱ्या मैत्रिणीला दिवसाला दीड हजारहून अधिक मिस्डकॉल्स देऊन त्रास देण्याचा प्रकार मालाड येथील तरूणाच्या चांगलाच अंगलट आला आहे. अनोळखी नावाने, दरवेळी वेगवेगळ्या सीमकार्डचा वापर करून मैत्रीण तसेच तिच्या आईवडिलांना त्रास देणारा हा माथेफिरू प्रियकर मालाड पोलिसांच्या कोठडीत आहे.
अविनाश डोके (२५) असे या अटक केलेल्या तरूणाचे नाव आहे. सोमवारबाजार परिसरात राहणाऱ्या या तरूणाचे एका महाविद्यालयीन तरूणीवर एकतर्फी प्रेम होते. सी.ए.चा अभ्यासक्रम पूर्ण करीत असलेल्या तरूणीला त्याने दहा महिन्यांपूर्वी प्रेमाबद्दल विचारणाही केली होती. मात्र या तरूणीने त्याला नकार दिला होता. अविनाशने तिच्या नकारानंतर मैत्री कायम ठेवली. गेल्या सहा महिन्यांपासून तो तरूणीला तिच्या मोबाईलवर दिवसाला शेकडो मिस्डकॉल्स व एसएमएस करू लागला.
सततच्या मिस्डकॉल्स आणि एसएमएसला कंटाळलेल्या या तरूणीने आपला मोबाईल क्रमांक तीन वेळा बदलला. यानंतर मात्र तिचे आई वडिल, मामा आदींना अशाच प्रकारे अविनाश त्रास देऊ लागला. हा सगळा उद्योग आपल्या ओळखीचाच तरूण करीत असल्याची माहिती तरूणीला मुळीच नव्हती.
याप्रकरणी तिने बुधवारी मालाड पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिस निरिक्षक दिपक फटांगडे व उपनिरिक्षक चिमाजी आढाव यांच्या पथकाने या परिसरातून शुक्रवारी दुपारी अविनाशला अटक केली.

एअरटेलची नेटवर्क यंत्रणा जळून खाक

मुंबई, ता. १९ - लोअर परळ येथील पेनीनसुला चेंबर्स इमारतीच्या तळमजल्यावर दिनांक १८ रोजी सकाळी भीषण आग लागली.
या आगीत एअरटेल मोबाईल नेटवर्कचा पुरवठा करणारी यंत्रणा पूर्णतः जळून खाक झाल्याने शहरातील हजारो एअरटेल मोबाईल ग्राहकांचे फोन आज दिवसभर बंद होते. सायंकाळी उशिरापर्यंत अग्निशमन दलाचे सोळा बंब ही आग विझविण्याची शर्थ करीत होते. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असून त्यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
लोअर परळच्या प्रसिद्ध पेनीनसुला पार्कमध्ये असलेल्या या इमारतीच्या तळमजल्यावर सकाळी पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. या इमारतीत मोठमोठ्या कंपन्यांची कार्यालये आहेत. इमारतीचा तळमजला व पहिल्या मजल्यावर एअरटेलचे कार्यालय आहे. तळमजल्यावर या मोबाईलला नेटवर्क पुरविणारी यंत्रणा बसविण्यात आली आहे. या वाहिन्या या इमारतीच्या आतील बाजूने इमारतीच्या टेरेसपर्यंत जातात. या यंत्रणेत असलेल्या वाहिन्यांना शॉर्टसर्किटमुळे आग लागली. मोबाईलला नेटवर्क पुरविण्यात उपयोगी ठरणाऱ्या वाहिन्यांच्या जाळ्यालाच ही आग लागली आणि काही क्षणातच ती संपूर्ण तळमजल्यावर पसरली. तळमजल्यावरून धुराचे लोट येऊ लागल्यानंतर इमारतीच्या सुरक्षारक्षकांनी या आगीची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना दिली.
अग्निशमन दलाच्या सोळा बंबांनी घटनास्थळी धाव घेतली. इमारतीच्या तळमजल्यात शिरून आग विझविताना जवानांना मोठ्या प्रमाणावर अडचणी येत होत्या. दुपारी तीन वाजेपर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. या आगीत एअरटेलची नेटवर्क यंत्रणा पूर्णतः जळून खाक झाल्याने शहरातील एअरटेलच्या हजारो ग्राहकांना त्याचा फटका बसला. रात्री उशिरापर्यंत एअरटेलची ही विस्कळित झालेली सेवा पूर्वपदावर आली नव्हती.

बाळासाहेब शिवसेना खासदारांना स्वतः भेटणार

बहुमताच्या प्रश्नावरून तिकडे दिल्लीत हवा तापली असताना मुंबईतही मातोश्री भवनावर हालचाली सुरू झाल्या असून अणू कराराच्या मुद्द्यावरून पक्षाच्या खासदारांची दुपारी होणारी बैठक रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदारांना मातोश्रीवर स्वतः भेटणार आहेत.
कॉग्रेसने शिवसेनेचे १२ पैकी ३ खासदार आपल्या सोबत असल्याचा दावा केला आहे. त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. बहुमत ठरावाच्या संदर्भात पक्षाने आपली भूमिका यापूर्वीच स्पष्ट केली असून आपण रालोआ सोबत असल्याचे स्पष्ट केले आहे.
त्यामुळे या बैठकीत फारसे काही होणार नसले तरीही बाळासाहेबांनी खासदारांना स्वतः भेटीसाठी बोलावल्याने मातोश्रीवरून काय आदेश येतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या बैठकीत शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेही खासदारांशी चर्चा करणार आहेत.

डाव्यांच्या व्हीपमध्ये सोमनाथदांचे नाव नाही

डाव्या विचारसरणीच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षांनी आपल्या ५३ लोकसभा सदस्यांना २० जुलैपर्यंत राजधानीत पोचण्याच्या आणि २२ जुलै रोजीच्या संसदेतील बैठकीत मनमोहन सरकार विरोधात अविश्वास प्रस्तावाविरुद्ध मतदान करण्याबाबतचा व्हीप बजावला आहे.
असे असले तरीही व्हीप बजावलेल्या खासदारांमध्ये लोकसभा सभापती सोमनाथ चॅटर्जींचे नाव नाही.
कॉग्रेस प्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडीचा पाठिंबा काढून घेतलेल्या रिव्होल्युशनरी सोशालिस्ट पार्टी तसेच फॉरवर्ड ब्लॉक हे अन्य दोन डावे पक्षही या संदर्भात आपल्या खासदारांना रविवारी मार्गदर्शक सूचना देणार आहेत.