शुक्रवार, 29 अगस्त 2008

जुन्या पिढीतील गायिका लीला नायडू यांचे पुण्यात निधन

पुणे, २९ ऑगस्ट- जुन्या जमान्यातील प्रसिद्ध गायिका लीला नायडू (वय ८६; पूर्वाश्रमीच्या लीला पाठक) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे एक मुलगा, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे.
ज्येष्ठ भावगीत गायक गजाननराव वाटवे यांच्याबरोबर त्यांनी गायलेले "हवास मज तू हवास सखया' हे "दहा वाजता' या "प्रभात'च्या चित्रपटातील गीत आजही रसिकांच्या मनात घर करून आहे.
प्रभात आणि नवयुग फिल्म कंपनीच्या "गोकूळ' "किती हसाल' "नवरदेव' या चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्‍वगायन केले होते. "संगीत सौभद्र' या नाटकात त्यांनी केलेल्या कृष्णाच्या भूमिकेचे आचार्य अत्रे यांनी कौतुक केले होते.

जयश्री गडकरी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

मुंबई, २९ ऑगस्ट- ज्येष्ठ अभिनेत्री जयश्री गडकर यांच्या पार्थिवावर आज दुपारी दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी सिने तसेच नाट्य सृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.
जयश्रीताईंच्या हाजी अली येथील निवासस्थानापासून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. तत्पूर्वी ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांच्यासह अनेकांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. ज्येष्ठ नाट्यनिर्माते मोहन वाघ , लता नार्वेकर , आशा काळे , प्रकाश भेंडे व उमा भेंडे , दिग्दर्शक शशिकांत देशपांडे यांचा त्यात समावेश होता. दुपारी तीन वाजता अंत्ययात्रा शिवाजी पार्कला पोहोचली. तेथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

जावडेकरांच्या मद्यपानावर 'प्रकाश'

मुंबई, २९ ऑगस्ट- जगाला नैतिकतेचे डोस पाजणार्‍या भारतीय जनता पक्षाचे एकेक नेते नवनवीन वादात अडकत आहे. ताजा वाद आहे राष्ट्रीय प्रवक्ते खासदार प्रकाश जावडेकर यांच्यासंदर्भातला.
इंदूरमध्ये एका कार्यक्रमासाठी आलेल्या जावडेकरांची मद्याचे चषक हातात घेताना व चीअर्स करतानाची छायाचित्रे स्थानिक वर्तमानपत्रांनी प्रसिद्ध केल्याने भाजप चांगलाच अडचणीत आला आहे.
त्यांच्या या छायाचित्रांवरून सध्या मध्य प्रदेशातील राजकारण चांगलेच तापले असून, कॉग्रेसनेही जावडेकरांविरोधात टीकेची झोड उडवली आहे. मंगळवारी जावडेकर इंदूरमध्ये एका खाजगी कार्यक्रमासाठी आले होते, कार्यक्रम आटोपून ते हॉटेलमध्ये परतल्यावर तेथे शॅंपेन पार्टी झाली. यात शॅंपेनची बाटली उघडतानाचा फोटो येथील वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आला आहे. सुरुवातीला हे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु आता हे प्रकरण चांगलेच पेटले आहे.
यापूर्वी, भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस संजय जोशी हेही एका सेक्स कॅंडलच्या सीडी प्रकरणात अडकले होते. तर दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांचा उत्तराधिकारी म्हणून ज्याचे नाव घेतले जात होते, ते त्यांचे पुत्र राहुल महाजनही अमली पदार्थ सेवन करताना आढळून आल्याने भारतीय जनता पार्टीचा खरा चेहरा उघड झाल्याची टीका प्रदेश कॉग्रेस प्रवक्ते मानक अग्रवाल यांनी केली आहे.

"नॅनो' प्रकल्पाचे कामकाज ठप्प

नवी दिल्ली, २९ ऑगस्ट- तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी "टाटा मोटर्स'च्या सिंगूर प्रकल्पाकडे जाण्याचा रस्ता अडवला आहे. त्यामुळे येथील कामकाज ठप्प झाले आहे, असे "टाटा'च्या प्रवक्‍त्यांनी सांगितले आहे.
ममता बॅनर्जींच्या समर्थकांनी "नॅनो'कडे जाणाऱ्या रस्त्यावर झोपून येणाऱ्या कामगारांना कंपनीत प्रवेश करु दिला नाही.
हिंसाचाराच्या भीतीने येथील कर्मचाऱ्यांनीही कंपनीच्या आवारात येणे टाळले.
या प्रकल्पासाठी घेतलेल्या जमीनीपैकी चारशे एकर जमीन शेतकऱ्यांना परत करावी, अशी मागणी तृणमूल कॉंग्रेसने केली. ही जमीन शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने घेतली गेली आहे, असे तृणमूल कॉंग्रेसचे मत आहे.
रतन टाटा मात्र अशी कोणतीही तडजोड करण्यास तयार नाहीत. किंबहुना कामात अशा प्रकारचे अडथळे येत असतील आणि हिंसाचार सुरुच राहणार असेल तर आपण हा प्रकल्प दुसरीकडे हलवू, असा इशारा रतन टाटा यांनी दिला आहे.

चारित्र्यहीन स्त्रीवर बलात्कार हा गुन्हाच

नवी दिल्ली, २९ ऑगस्ट- अनेकांशी संबंध असलेल्या महिलेवर शारीरिक संबंध कोणालाही लादता येणार नाहीत आणि तशी मुभाही कायद्याने कोणाला दिलेली नाही, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने आज सुनावले.
बलात्काराच्या खटल्यात निर्दोष सोडलेल्या दोन आरोपींच्या खटल्याबाबत न्या. अरिजित पसायत आणि मुकुंदकम शर्मा यांनी हा निकाल दिला.
सतरा वर्षांच्या एका मुलीवर बलात्कार केल्याबद्दल मुन्शी आणि अन्य एका आरोपीला स्थानिक न्यायालयाने दोषी ठरविले होते. त्यानंतर अलाहाबाद उच्च न्यायालयाने त्यांना निर्दोष मुक्त केले. ती मुलगी कुमारिका नव्हती, या मुद्द्यावर न्यायालयाने आरोपींची सुटका केली होती. त्यावर सरकारने सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. मुलगी कुमारिका नाही याचा अर्थ तिच्यावर कोणीही बलात्कार करावा असा नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. उच्च न्यायालयाने पुन्हा हा खटला चालविण्याचा आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिला.