बुधवार, 27 अगस्त 2008

विद्या देशमुख हत्या प्रकरणी महबूब खानला फाशी

औरंगाबाद, २७ ऑगस्ट- बहुचर्चित विद्या देशमुख खून प्रकरणी परभणी येथील न्यायालयाने मुख्य आरोपी महबूब खानला फाशीची शिक्षा सुनावली. २००३ मध्ये परभणी येथील भाग्यनगर भागात ही घटना घडली होती.
१६ वर्षीय विद्यावर चाकूने हल्ला करत महबूब खान आणि त्याच्या साथीदाराने तिचा खून केला होता.
याप्रकरणी पोलिसांनी महबूब खानला २००६ मध्ये हैदराबाद येथून अटक केली होती. या प्रकरणाचा निकाल काल लागला. यात न्यायालयाने महबुब खान याला दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली. त्याचा साथीदार असलेल्या वसीम याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
तब्बल २५ वर्षांनंतर परभणी न्यायालयाने एखाद्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा सुनावली आहे. निकाल लागल्यानंतर विद्याचे वडील दत्ताराव देशमुख यांनी समाधान व्यक्त केले आहे.

मराठी पाट्या लावा, नाहीतर... - राज ठाकरे

मुंबई, २७ अगस्त- दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी दिलेली मुदत उद्या संपत असतानाच, बुधवारी पुन्हा एकदा "मनसे'चे प्रमुख राज ठाकरे यांनी हे आंदोलन तीव्र करण्याचे संकेत दिले.
वांद्रयातील रंगशारदा सभागृहात आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या शिबिरात श्री. ठाकरे यांनी "एक दिवसाच्या आत मराठी पाट्या लावल्या नाहीतर, उद्या परिणामांबद्दल विचारू नका' असे सांगत व्यापाऱ्यांना कडक शब्दांत इशारा दिला.
आंदोलन करून पोलिसांना त्रास देण्याची आपली इच्छा नाही. मराठीच्या नावाने आम्ही जे आंदोलन करीत आहोत ते कायद्याचा पालनासाठीच करीत आहोत. त्यामुळे आंदोलकांना सहकार्य करावे, असेही आवाहन त्यांनी केले.
भाषणात त्यांनी १९६१ च्या कायद्याचाही उल्लेख केला. या कायद्यान्वये प्रत्येक राज्यातील दुकानांच्या पाट्या त्या राज्याच्या स्थानिक भाषेत असायला हव्यात. देशातील सर्व राज्यांमध्ये हा कायदा काटेकोरपणे पाळला जातो. पण येथील व्यापारी न्यायालयात जाण्याची भाषा करतात. हे काय चालू आहे, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.

"कस्टम'चे २२ अधिकारी बारबालांसमवेत पोलिसांच्या ताब्यात

खंडाळा, २७ ऑगस्ट- - खंडाळ्यातील प्रसिद्ध फरियाझ हॉटेलच्या मागे असलेल्या ताज कॉटेज या खासगी बंगल्यावर लोणावळा शहर पोलिसांनी मंगळवारी रात्री टाकलेल्या छाप्यात सीमा शुल्क विभागाचे २२ अधिकारी, ११ बारबाला आणि इतर सहा जणांना ताब्यात घेतले. रात्री साडे अकराच्या सुमारास हा छापा टाकण्यात आला.
सीमाशुल्क विभागातील अधीक्षक आणि निरीक्षक पदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे। कान्हा ग्रामीण रुग्णालयात या सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या सर्वांना सध्या पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे. दुपारी अडीच वाजता त्यांना वडगाव येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
ताब्यात घेतलेल्या सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांची नावे आणि त्यांचे पद-
- अजयकुमार षण्मुगम (वय ४४, रा. ठाणे) निरीक्षक - शंकरतन कृष्ण मुंडा (वय ५०, रा. भांडूप, मुंबई) अधीक्षक - विनयकुमार नाथ (वय ३९, रा. माटुंगा) निरीक्षक - अनुपम कोस्टा (वय ३९, रा. माटुंगा) निरीक्षक - महेश वसंत जाधव (वय ४५, रा. ठाणे) निरीक्षक - संतोष ऊर्फ गुरुचरण बाळकृष्णराव (वय ५०, रा. दादर) अधीक्षक - अन्वर इस्माईल खान (वय ५२, रा. अंधेरी) अधीक्षक - सबील करुणन (वय ४५, रा. ठाणे) निरीक्षक - भास्कर खंडू हांडे (वय ५२, रा. शिवडी) अधीक्षक - विमलकुमार गुलाबरॉय सोनेजा (वय ४२, रा. वाशी) निरीक्षक - चंद्रकांत मनसाराम मोरे (वय ५०, रा.कल्याण) निरीक्षक - नरेंद्रकुमार महिचंद रायपुरीया (वय ३१, रा. पवई) निरीक्षक - मॅथ्यू मामेन (वय ५४, रा. मुंबई) अधीक्षक - मनसूख रामचंद्र लिंगायत (वय ५६, रा. ठाणे) अधीक्षक - रविचंद्रन कलाईप्पा (वय ४२, रा. पवई) निरीक्षक - ओमनारायणन कृष्णमुरारी (वय ५०, रा. पवई) अधीक्षक - ओमप्रकाश रामानंद पांडे (वय ४५, रा. मुलुंड) अधीक्षक - शिवसिंग कमल यादव (वय ४७, रा. पवई) अधीक्षक - राजेश भाऊराव ढोणे (वय ४०, रा. माटुंगा) अधीक्षक - रमेशबाबू सूर्यनारायण वंगेती (वय ४४, रा. पवई) अधीक्षक - सतीश नारायण उच्छील (वय ५६, रा. बांद्रा) अधीक्षक - विजयकृष्णकुमार राघवन (वय ३६, रा. पवई) निरीक्षक

हिंदुच्‍या हत्‍येवर कॉंग्रेस शांत का?- बाळासाहेब

मुंबई, २७ ऑगस्ट-शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ओरीसात नक्षलवाद्यांकडून स्वामी लक्ष्मणानंद यांच्‍या हत्येच्‍या घटनेची कडक शब्‍दात टिका केली असून ‘माओवाद हा मुस्‍लीम दहशतवादा इतकाच गंभीर असल्‍याची टिका केली आहे.
शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’मधील संपादकीय लेखात ठाकरे यांनी म्‍हटले आहे, की 85 वर्षीय लक्ष्मणानंद ओरीसात ख्रिस्‍ती मिशन-यांकडून गरीब आदिवासींच्‍या धर्मांतरणास विरोध करीत असल्‍यामुळेच त्‍यांची हत्या केली गेली आहे.
ठाकरे यांनी धर्मनिरपेक्षवादी असल्‍याचा दावा करणा-या कांग्रेस, राष्ट्रवादी, डावे आणि बहुजन समाज पार्टीच्‍या नेत्‍यांना लक्ष्‍य करताना टीका केली आहे, की ओरीसात लक्ष्मणानंद यांची हत्या केल्‍याच्‍या घटनेचा या पक्षांनी निषेध का केला नाही.