मंगलवार, 30 सितंबर 2008

शिवरायांचे गुरू दादोजी कोंडदेवच

पुणे, ३० सप्टेम्बर- छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू दादोजी कोंडदेव होते, हे सांगणारे इतिहासात अनेक पुरावे उपलब्ध असल्याचा दावा इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, गजानन मेहेंदळे आणि निनाद बेडेकर यांनी सोमवारी केला। शहाजी राजांच्या नावे पुरस्कार देण्याचा निर्णय स्वागतार्ह असला, तरी आधीच्या पुरस्कारातून दादोजी कोंडदेव यांचे नाव काढून टाकणे गैर आहे. ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू होते का नव्हते, हे निष्कर्ष पुरस्कारासाठी लावणे चुकीचे असल्याचे मत त्यांनी मांडले आहे.
काही मोजक्या व्यक्ती आणि संघटनांच्या दडपणाखाली सरकारने समिती नेमली असून त्यांच्या अभ्यासावर आधारित चुकीचे निर्णय सरकार घेत असल्याची टीका बलकवडे यांनी केली. वेगवेगळ्या विद्यापीठाच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमातही शिवाजी महाराजांना दादोजी कोंडदेव यांनी शिकवल्याचे उल्लेख असून त्याकडे समितीने दुर्लक्ष केल्याचे ते म्हणाले. हा एक प्रकारचा सांस्कृतिक दहशतवाद असल्याचा आरोपही त्यांनी केला. सरकारने नेमलेल्या अभ्यास समितीत परस्परच नेमणूक केली असून आपल्याला याबद्दलची माहिती वृत्तपत्रातूनच कळाली असल्याचे मेहेंदळे आणि बेडेकर यांनी स्पष्ट केले. याबाबतचे कोणतेही लेखी पत्र किंवा साधा फोनही अधिकृतरित्या केला नसल्याचे ते म्हणाले. या समितीत १५ अभ्यासक असून यातल्या १० जणांना इतिहासातले काहीही कळत नसल्याचे बेडेकर यांनी नमूद केले. ज्यांना फारसी, मोडी आणि पशिर्यन येत नाही ते कसले अभ्यासक असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
सरकार संशोधनात जातीयवाद आणत असून दादोजी कोंडदेव ब्राह्माण होते म्हणूनच त्यांचे नाव बाजूला करण्याचा घाट काही संघटना आणि व्यक्तींनी घातला असल्याचे मेहेंदळे म्हणाले. या सर्व घटनांचा संशोधनावर परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले.


चामुंडादेवी चेंगराचेंगरी प्रकरणी चौकशीचे आदेश

जोधपूर, ३० सप्टेंबर- राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी चामुंडादेवी चेंगराचेंगरी कांडानंतर चौकशीचे आदेश दिले असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे.
जखमींनी प्रत्येकी पन्नास हजार रूपयांची मदत देण्यात येईल. राजे यांनी मेहरनगढ भागातील घटनास्थळी भेट दिल्यानंतर अतिरिक्त मुख्य सचिव दर्ज्याच्या अधिकाऱ्यास चौकशी सोपवण्यात येणार असल्याचे सांगितले.
कॉंग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी याप्रकरणी न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे.

मालेगांव बळींना सरकारची मदत जाहीर

मुंबई, ३० सप्टेंबर- महाराष्ट्र सरकारने मालेगाव बॉम्बस्फोटात बळी पडलेल्यांच्या नातेवाईकांना पाच लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे. गंभीर जखमींना पन्नास हजार तर तुरळक जखमींना पंचवीस हजार रूपयांची मदत देण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री विलासराव देशमुख युरोपच्या दौऱ्यावर असून स्फोटात जखमी झालेल्या पोलिसांना आर्थिक साहाय्य उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. मालेगावात काल रात्री वर्दळीच्या भिक्कू चौक भागात झालेल्या बॉम्बस्फोटात चार जणांचा बळी गेला तर सत्तर जण जखमी झाले आहेत.