रविवार, 31 अगस्त 2008

इन्सपेक्टर प्रदीप शर्माचा ‘एन्काउंटर’; पोलिस सेवेतून बडतर्फ

मुंबई, ३१ ऑगस्ट-मुंबईतल्या गुन्हेगारी टोळ्यांमध्ये एकेकाळी प्रचंड दरारा असलेले एन्काउंटर स्पेशालिस्ट पोलिस निरीक्षक प्रदीप शर्मा यांना शनिवारी पोलिस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे। ११२ गुंडांना चकमकीत ठार करणारे शर्मा यांच्यावर कुख्यात ‘ डी ’ कंपनीला मदत करणे तसेच हजारो कोटीची बेहिशीबी मालमत्ता ठेवण्याचे गंभीर आरोप होते.
यासंबंधात शर्मा यांची पोलिस विभागातर्फे खातेनिहाय चौकशी करण्यात आली होती. या चौकशीत शर्मा दोषी आढळल्यानं कलम ३११ अंतर्गत त्यांना पोलिस सेवेतून बडतर्फ करण्यात आल्याचं वृत्त आहे.
१९८३ साली महाराष्ट्र पोलिस दलात सामिल झालेले शर्मा अंमली पदार्थ विरोधी पथकात असताना पहिल्यांदा प्रकाशझोतात आले होते. मुंबई पोलिस दलातील विविध विभागांमध्ये त्यांनी उपनिरीक्षक आणि निरीक्षक म्हणून काम केले आहे. मुंबई पोलिसांचे खंडणी विरोधी पथक, गुन्हे अन्वेषण विभागातही त्यांनी काम केले होते. शिवाय मुंबईतल्या डी.एन. नगर पोलिस ठाण्यातही ते काही काळ कार्यरत होते.
प्रदीप शर्मा यांची अमरावती येथे बदली करण्यात आली होती. मात्र तिथला कार्यभार त्यांनी स्वीकारला नव्हता. त्यानंतर आजारपणाचे कारण दाखवून त्यांनी मुंबईत परत बदली करवून घेतली होती. शर्मा यांना काही काळ सेवेतून निलंबित करण्यात आले होते.
मुंबई पोलिस दलात असताना प्रदीप शर्मा यांनी काही कुख्यात गुन्हेगारांना मदत केली असल्याचा गंभार आरोप कुख्यात गुंड छोटा राजनने न्यूज चॅनलशी बोलताना केला होता. शिवाय शर्मा यांनी एक हजार कोटी रूपयांची बेहिशेबी मालमत्ता साठवल्याचा आरोपही करण्यात आला होता.
यापूर्वी बेहिशेबी मालमत्ता ठेवल्याच्या आरोपातून मुंबई पोलिस दलातील इन्सपेक्टर दया नायक यांना पोलिस दलातून काढून टाकण्यात आले होते.

नाशिक जिल्ह्यात वीज कोसळून ५ महिला जखमी

नाशिक, ३१ अगस्त- चांदवड तालुक्‍यातील शिंडे येथे वीज पडून पाच महिला जखमी झाल्या आहेत. येथील तुकाराम मंदिराच्या आडोस्याला या महिला उभ्या असताना वीज कोसळली. रविवारी दुपारी ही घटना घडली.
गंभीर जखमी झालेल्या एका महिलेला नाशिकच्या रूग्णालयात तर अन्य ४ महिलांना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे।
जखमी महिलांची नावे अशी, राधाबाई बाजीराव बरडे, सुनिता मनोहर गोधडे, कमल रंगनाथ शिंदे, कल्याबाई नारायण पवार आणि अंजनाबाई राजाराम गोधडे.

विदर्भात दोन दिवसांत ९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

नागपूर, ३१ ऑगस्ट - विदर्भात गेल्या दोन दिवसांत नऊ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहीती विदर्भ जन आंदोलन समितीने रविवारी येथे दिली.
यामध्ये यवतमाळमध्ये तीन, बुलढाणा आणि चंद्रपूर जिल्ह्यात प्रत्येकी दोन, तर अमरावती आणि नागपूरात प्रत्येकी एका शेतकऱ्यांने कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली.
यवतमाळमधील दोन शेतकऱ्यांनी तसेच नागपूरातील व चंद्रपूर जिल्ह्यातील एक अशा चौघा शेतकऱ्यांनी शनिवारी बैल पोळा सणादिवशीच आपली जीवनयात्रा संपवली.

पूरग्रस्‍तांसाठी मदतीचे हात सरसावले

नवी दिल्ली, ३१ ऑगस्ट-बिहारमध्‍ये कोसी नदीला आलेल्‍या महापुरामुळे मोठ्या अडचणींचा सामना करीत असलेल्‍या नागरिकांच्‍या मदतीसाठी देशभरातून मदतीचे हात सरसावले आहेत. नेते, अभिनेते, लष्‍करासह खेळाडूंनीही पूरग्रस्‍तांच्‍या मदतीसाठी सर्वतोपरी मदत करण्‍यास सुरूवात केली आहे. लष्‍कराच्‍या पश्चिम विभागातील जवानांना मदतकाया्रसाठी मुंबईहून बिहारला रवाना करण्‍यात आले आहे.
रेल्‍वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी रेल्‍वेच्‍या अधिका-यांना पूरग्रस्‍तांना रेल्‍वेच्‍या प्रवास भाड्यात सूट देण्‍याचे आदेश दिले आहेत. या सोबतच बिहारच्‍या रेल्‍वे स्टेशनांवर त्‍यांना फूड पॅकेट्सही उपलब्‍ध करून देण्‍यात आले आहेत.
महाराष्ट्र सरकारनेही मदत जाहीर केली असून मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी या कामासाठी २५ कोटी रुपयांची घोषणा केली आहे. तर हरियाणा सरकारने ५ कोटी देण्‍याचे आश्‍वासन दिले आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांनी भाजपची सत्‍ता असलेल्‍या राज्‍यातील मुख्यमंत्र्यांना पूरग्रस्‍तांच्‍या मदतीसाठी पुढे येण्‍याचे आवाहन केले आहे. तर भाजपने स्‍वतः त्‍यासाठी निधी उभारण्‍याचे प्रयत्‍न सुरू केले आहेत.
ऑलम्पिक पदक विजेता ‍अभिनव बिंद्रा आणि अभिनेता सुनील शेट्टी यांनीही पूरग्रस्‍तांसाठी मदतीची घोषणा केली आहे. बिंद्राने पूरग्रस्‍तांसाठी ५ लाख रुपये देण्‍याची घोषणा केली आहे. तर सुनील शेट्‍टी याने लोकांना बिहारच्‍या मदतीसाठी धावून जाण्‍याचे आवाहन केले आहे.
पतंजलि योग पीठातर्फे पूरग्रस्‍तांसाठी दोन कोटी रुपयांचे औषधे आणि अन्‍नधान्‍य देण्‍याची घोषणा करण्‍यात आली आहे.

टी. चंदशेखर घेणार राजकारणाची सनद?

मुंबई, ३१ ऑगस्ट-महाराष्ट्राच्या प्रशासनात धडाडीचे सनदी अधिकारी म्हणून ओळखले जाणारे टी. चंदशेखर हे प्रशासकीय सेवेचा राजीनामा देऊन आंध्र प्रदेशच्या राजकारणात सक्रिय होणार असल्याचे कळते. तेलगू चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार चिरंजीवी याच्या 'प्रजा राज्यम्' या पक्षातून ते आपली नवी कारकीर्द सुरू करतील, अशी चिन्हे आहेत.
ठाणे, नागपूर व मुंबईत एमएमआरडीएचे आयुक्त म्हणून धडाकेबाज विकासकामे करून चंदशेखर यांनी स्वत:चा ठसा उमटविला. राजकीय नेत्यांच्या 'गुडबुक'मध्येही त्यांनी स्थान मिळविले. परंतु म्हाडाचे उपाध्यक्ष असताना त्यांचे खासदार गुरूदास कामत यांच्याशी मतभेद झाले. तेव्हा त्यांनी थेट आपल्या सनदी सेवेचा राजीनामा मुख्यमंत्र्याकडे दिला. परंतु तो मुख्यमंत्र्यांनी मंजूर केला नव्हता. त्यानंतर ते सहा महिन्यांच्या सुट्टीवर गेले असून त्यांचा सध्या आंध्र प्रदेशमध्ये मुक्काम आहे. चंदशेखर यांचा राजीनामा लवकरच मंजूर होऊन ते राजकारणात उडी घेतील. सहा-सात महिन्यांत लोकसभेबरोबर आंध्र विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत। त्यापूवीर् ते राजकारणात प्रवेश करतील हे नक्की.
१९८७ च्या आयएएस बॅचचे असलेले टी. चंदशेखर हे परदेशात गेले असल्याची चर्चा आयएएस अधिकाऱ्यांमध्ये होती. ते पुन्हा प्रशासकीय सेवेत परतणार नसल्याचेही बोलले जात होते. मात्र गेले काही महिने ते आंध्र प्रदेशमध्ये दौरे करत आहेत. नव्या पक्षाच्या स्थापनेमागे त्यांचाच 'ब्रेन' असल्याचे बोलले जाते. आपली राजकीय महत्त्वाकांक्षा त्यांनी काही दिवसांपूवीर् जवळच्या मित्रांकडे बोलून दाखवली होती. आंध्रमधील राजकीय नेत्यांशी त्यांचा निकटचा संबध आहे. दिवंगत माजी पंतप्रधान नरसिंहराव यांच्या कुुटुंबाशीही त्यांचे चांगले संबध आहेत.