शनिवार, 23 अगस्त 2008

निरुपम ‘बिग बॉस’ बाहेर

मुंबई, २३ ऑगस्ट-' बिग बॉस ' सारख्या कार्यक्रमात भाग घेण्याची रिस्क घेणारा , मी देशातील पहिला राजकारणी आहे , अशी बढाई मारणारे काँग्रेसचे नेते संजय निरुपम बिग बॉस मधून ‘ आऊट ’ झाले आहेत. या शो मधून आपल्याला बाद करण्यात यावे , अशी विनंती आपणच सहभागी स्पर्धकांना केल्याचे निरुपम यांनी सांगितले.
बिग बॉस मधून निरुपम यांचे बाहेर जाणे हे प्रिप्लॅन होते. त्यांना आपल्या पाच लाखांच्या दहीहंडीचे वेध लागले होते. बिग बॉसमध्ये राजकारण्याबद्दलचे भारतीयांचे मत बदलण्यासाठी आलेल्या निरुपम यांनी बढाई मारली. पण , १४ स्पर्धेकांशी जुळवून घेण्यात त्यांना अपयश आले. मग काय आपल्याला शोमधून काढून टाकावे म्हणून मुद्दाम प्रयत्न केल्याची सारवासारव ते करताना दिसत आहेत. हे सांगणे विसंगत असून कोल्ह्याला द्राक्षे आंबट हा त्यातला प्रकार असल्याचे बोललं जातेय.
खरं तर तीन महिने या शोसाठी वेळ देणे आपल्यासारख्या राजकारण्याला शक्य नाही. जास्तीत-जास्त एक आठवडा शक्य असतो तो वेळ मी दिला. पण या स्पर्धेत भाग घेणा-या अनोळख्या माणसांशी ओळख झाली , तो अनुभव राजकारणात फायद्याचा ठरेल , असे त्यांनी सांगितले.

दौंड रेल्वे स्थानकावर पोलिसांच्या ताब्यातून गुन्हेगार फरार

दौंड, २३ ऑगस्ट- येथील रेल्वेस्थानकावरून कुख्यात गुन्हेगार अंकुश ऊर्फ अंक्‍या वसंत काळे हा काल रात्री पोलिसांच्या ताब्यातून पळून गेला.
न्यायालयीन कामकाजासाठी त्याला येरवडा कारागृहात नेले होते. तेथून त्याला दौंड स्थानकावर आणण्यात आले. त्याच्यावर खून, दरोडे, जबरी चोरी असे एकूण सात गुन्हे दाखल आहेत. नगर जिल्ह्यातील पोलिस शिपाई अंकुश धावडे याच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करून त्यांची हत्या केल्याच्या प्रकरणातील तो प्रमुख आरोपी आहे.
दौंड पोलिस, दौंड लोहमार्ग पोलिस आणि पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या पथकाने परिसराची नाकेबंदी केली असून, शोध घेण्याचे काम सुरू आहे.

अजितसिंहांनी सोडली मायावतीची सोबत

नवी दिल्ली, २३ ऑगस्ट- मायावतींच्‍या राजकीय डावपेचांनी हताश झालेल्‍या राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष अजितसिंह यांनी कॉंग्रेस आणि भाजप दोघांसोबत पुन्‍हा चर्चा सूरू केली असून लवकरच ते मायावतींची सोबत सोडण्‍याची शक्‍यता आहे.
भाजप अजितसिंग यांच्‍या सोबत निवडणुकीत आघाडी करण्‍यासाठी उत्सुक आहे. तर कॉंग्रेसने आपल्‍याला अशी गरज नसल्‍याचे स्‍पष्‍ट केले आहे.
विश्वासमत ठरावाच्‍या वेळी संपुआच्‍या विजयानंतर बसपामध्‍ये गेलेल्‍या अजितसिंह यांच्‍या जवळच्‍या सुत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार अजितसिंह यांना मायावतींची कार्यपध्‍दती आवडत नसून ते नाराज आहेत.
९ ऑगस्‍टला लखनऊमध्‍ये झालेल्‍या रॅलीत मायावतीने 'एकला चलो' संदेश दिला. तेव्‍हा पासून अजितसिंह नवीन आघाडीच्‍या शोधात आहेत. भाजपाच्‍या सुत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार पक्षाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि पक्षाध्यक्ष राजनाथसिंह हे रालोद सोबत आघाडी करण्‍यास अनुकूल आहेत.
भाजप अजितसिंह यांच्‍या मागणी नुसार त्‍यांना लोकसभेच्‍या निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्‍ये दहा जागा सोडण्‍यास तयार आहे. असे असले तरीही अजितसिंग भाजपसोबत गेल्‍यास पक्षात बंडाळी माजण्‍याची शक्‍यता आहे त्‍यामुळे अजितसिंग कॉंग्रेससोबत चर्चा करीत आहेत.

काश्‍मिर अशांतच, पुन्हा तीन दिवस "बंद'

श्रीनगर, २३ ऑगस्ट- (पीटीआय) : जम्मू-काश्‍मीरमधील फुटीरतावादी नेत्यांनी शुक्रवारी ईदगाह मैदानावर मोठा मेळावा घेऊन शनिवारपासून पुन्हा खोऱ्यात तीन दिवसांचा "बंद' पुकारला आहे.
काश्‍मीर मुद्द्यावरून भारत, पाकिस्तान आणि काश्‍मीरमधील नागरिकांनी एकत्र येऊन चर्चा करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
""पुढील तीन दिवस काश्‍मीरमध्ये पूर्ण "बंद' पाळण्यात येईल. शांततापूर्ण मार्गाने आम्ही निषेध करू,'' असे हुरियत कॉन्फरन्सचे अध्यक्ष मिरवैझ उमर फारुक यांनी सांगितले.
ईदगाह मैदानात फुटीरतावाद्यांचा जो मोठा मेळावा झाला त्यात हजारो लोकांनी हिरवे आणि काळे झेंडे दाखवले.
सोमवारी श्रीनगरच्या मुख्य लाल चौकात समितीतर्फे ठिय्या आंदोलनही केले जाणार आहे.

राणे आणि काँग्रेस; दोघेही कोंडीत!

मुंबई, २३ ऑगस्ट-महसूलमंत्री नारायण राणे दिल्लीला बोलाविल्याशिवाय जाण्यास तयार नाहीत आणि पक्षश्रेष्ठीही दिलेला राजीनामा स्वीकारला हे सांगायला तयार नाहीत, त्यामुळे राणे आणि काँग्रेस हे दोघेही कोंडीत सापडले असून यातून कसे बाहेर पडायचे असा पेच दोघांना सतावत असल्याचे समजते.
पेचप्रसंगातून मार्ग काढण्यासाठी राणे यांनी स्वत:हून पक्षश्रेष्ठींना भेटायला जावे, असा आग्रह काही काँग्रेस नेते करीत आहेत तर चीनच्या दौ-यावर जाण्यापूर्वीच आपण सोनिया गांधी यांची भेट मागितली होती, त्यामुळे पुन्हा भेट कशी मागणार, असा पवित्रा राणे यांनी घेतला आहे. तशात राणे यांचा राजीनामा स्वीकारला तर ते कालांतराने पक्षातूनही बाहेर जातील व त्यामुळे पक्षाचे मोठे नुकसान होईल, असे काही मंत्र्यांनी प्रत्यक्ष श्रीमती गांधी यांची भेट घेऊन सांगितल्याचे कळते. त्यामुळे राणे यांचा राजीनामा स्वीकारायचा नाही, पण त्यांनी स्वत: मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा पाठविला तर तो स्वीकारायचा असा निर्णय काँग्रेसने केला आहे.
पण आपण एकदा राजीनामा दिलेला असल्याने तो स्वीकारला अथवा फेटाळला यापैकी काहीही स्पष्ट होत नसल्याने आता राणे केवळ दिल्लीच्या निर्णयाची वाट पाहत आहेत, असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. राजीनामा स्वीकारला असे सांगितले तर राणे हे दुस-या क्षणी मुख्यमंत्री अथवा राज्यपाल यांच्याकडे राजीनामा पाठवून देतील, असेही त्यांच्या समर्थकांनी सांगितले.
राणे आणि काँग्रेस या दोघांची कोंडी झालेली असताना मध्येच केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल हे त्यांना भेटून गेल्याने तसेच राणे यांनी काँग्रेस सोडली तर त्यांनी आपल्या पक्षात यावे, यासाठी अनेकजण प्रयत्नाला लागल्याने काँगेसमध्ये काहीशी चलबिचल सुरू झाल्याचे कळते. राणे आणि काँग्रेस यांच्यामध्ये सुरु झालेला पेचप्रसंग सुटला नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दरवाजे खुले आहेत, असे संकेत देण्यासाठीच पटेल हे राणे यांना भेटले असावेत, असे काँग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
राणे यांनी टोकाचा निर्णय घेऊ नये, अशी विनंती करण्यासाठी काँग्रेसच्या दोघा खासदारांनी त्यांची भेट घेतली. पाठोपाठ रिपब्लिकन पक्षाचे खासदार रामदास आठवलेही त्यांना भेटून गेले. शुक्रवारी दुपारी उद्योगमंत्री अशोक चव्हाण यांनी राणे यांची भेट घेऊन चर्चा केल्याचे कळते. याबद्दल चव्हाण यांच्याकडे विचारणा करता महसूल खात्याशी संबंधित नांदेड जिल्ह्यातील काही प्रश्न सोडविण्यासाठी भेट घेतली होती, असे ते म्हणाले.
तहसीलदारांच्या काही जागा रिकाम्या असून दुष्काळी स्थिती असल्याने त्या लवकर भराव्यात, अशी विनंती केल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबईतली 'व्यावसायिक' दहीहंडी

मुंबई, २३ ऑगस्ट- गोकुळाष्टमी म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस ! श्रीकृष्णाचा जन्म गोकुळाष्टमीच्या रात्री 12 वाजेच्या सुमारास कंस राजाच्या कोठडीत झाला. पण श्रीकृष्ण वाढला मात्र गोकुळात. नंद आणि यशोदेच्या प्रेमात आणि गोपिकांच्या सहवासात. गोकुळातच चोरून लोणी खाणे, गोपिकांची छेड काढणे अशा लीला त्याने केल्या. घराच्या छताला टांगलेली दह्याची हंडी श्रीकृष्ण फोडायचा. तीच प्रथा आता दहीहंडीच्या रूपाने पाळली जाते. पण, काळाच्या ओघात हा उत्सव इतका बदलला आहे की, त्या मागची मुळ संकल्पनाच नाहीशी झाली आहे.
''गोविंदा आला रे आला....मटकी संभाल ब्रिजबाला !'' असे म्हणणार्‍या गोविंदाला बाजूला सारत आधुनिक युगात पुरूषाच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात वावरणार्‍या महिलाही दहीहंडी फोडण्यासाठी मैदानात उतरलेल्या दिसतात। मुंबईत चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी चाळीत गोकुळाष्टमी मोठ्या उत्साहात साजरी केली जायची. त्याकाळी गोपाळकाला मोठा उत्सव मानला जायचा. तेव्हा मात्र आतासारखी व्यावसायिकता त्यात नव्हती. दोन चाळीमध्ये दोरखंडाच्या आधारे दहीहंडी बांधली जायची. आंब्याची पाने, फुले, फळे व रूपये त्या दोरीला बांधले जायचे. दहीहंडीच्या जवळ हंडी फोडण्यासाठी नारळ बांधले जायचे. हंडी फोडण्यासाठी दोन पथकांमध्ये जोरदार स्पर्धा चालायची.
पण आता हा सण राजकारण्यांच्या ताब्यात गेला आहे। त्यात अनेक गुडांनीही स्वतःला 'सोवळे' करून घेण्याची संधी साधली आहे. अनेक 'भाई' लोकांनी आपली स्वत:ची दहीहंडी, गणपती, नवदुर्गा मंडळे स्थापन करून त्या माध्यमातून लाखो रूपयांची देणगी उकळण्याचा प्रकार सुरू केला आहे. त्यामुळे सामाजिक उत्सवातून व्यावसायिकता डोकावताना दिसत आहे. त्यातून उद्‍भवणारे वादविवाद आणि त्याला होणारा राजकारणाचा स्पर्श यामुळे हा सणही त्यात माखला गेला आहे. राजकारणी लोक अशा सामजिक महोत्सवाला भल्या मोठ्या देणग्या देवून आपल्या पक्षाची व नावाची प्रसिध्दी करण्याचा पुरेपूर प्रयत्न करताना दिसतात.
गेल्या काही वर्षांपासून मुंबईल्या चाळींची जागा गगनचुंबी अपार्टमेंटने घेतल्याने उंचच उंच दहीहंडी बांधल्या जातात. त्यांच्यावर ठेवण्यात आलेली बक्षिसेही लाखोंच्या घरात जाणारी आहेत. मुंबईतच्या दहीहंडीला आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रसिध्द मिळू लागली आहे. यंदाच्या वर्षी मुंबईत १० पेक्षा जास्त दहीहंड्यांना २० ते २५ लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. पुरूषांच्याच बरोबरीने महिलांची पथकेही सहभागी होणार आहेत. दंहीहंडी फोडण्याच्या वेळी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने यजमान मंडळाच्या वतीने गोविंदाचा विमा तसेच जागेवर प्राथमिक उपचाराच्या सोयी उपलब्ध करून देण्यात येतात. गोकुळाष्टमीच्या तीन महीने अगोदरच दहीहंडी फोडणार्‍या पथकांचा सराव सुरू होतो. सराव करतानाही काही जर जखमी होतात. मुंबईतील दहिहंडीकडे देशातीलच नाही तर विदेशातील मीडीयाचेही लक्ष लागलेले असते.

रस्ता अपघातांत घट

नवी मुंबई, २३ ऑगस्ट- वाहतूक पोलिसांनी महिनाभर राबविलेल्या 'झिरो टॉलरन्स' मोहिमेमुळे रस्ता अपघातांच्या प्रमाणात २६ टक्क्याने तर अशा अपघातांत मृत पावणा-यांच्या प्रमाणात २४ टक्क्याने घट झाल्याचा दावा नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी केला आहे.
मद्यप्राशन करून वाहन चालवणे, वेग मर्यादेचे उल्लंघन करणे, अवैध प्रवासी वाहतूक व शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून विना लायसन्स व अतिवेगाने वाहने चालविण्याच्या प्रकारांमुळे अपघाताच्या संख्येत प्रचंड वाढ झाली होती. या बाबी विचारात घेऊन अपघातांना आळा घालण्याच्या दृष्टीने पोलिस आयुक्त रामराव वाघ यांनी वाहतूक शाखेला सूचना केल्या होत्या. त्यानुसार पोलिस उपायुक्त एन. डी. चव्हाण (मुख्यालय), वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त धिवरे व वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद जाधव यांनी २० पोलिस अधिकारी व ६० पोलिस कर्मचा-यांच्या सहाय्याने गेला महिनाभर 'झिरो टॉलरन्स' मोहीम उघडली होती.
या मोहिमेत मद्यप्राशन करून वाहन चालविणा-यांविरुद्ध ९६ केसेस दाखल करून त्यांच्याकडून दंड वसूल केला. तसेच वेग मर्यादेचे उल्लंघन करणा-यांविरोधात ३३५३ केसेस दाखल करून ६,७९,७०० इतका दंड वसूल केला. त्याचप्रमाणे विना लायसन्स गाडी चालवणा-या शाळा - कॉलेजच्या विद्यार्थ्यांविरुद्ध १०३ केसेस दाखल करुन १०,३०० दंड तर अवैध प्रवासी वाहतूक करणा-यांविरुद्ध ८८१ केसेस दाखल करुन ८,६१,७०० इतका दंड वसुल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील अनेक वाहनचालकांना १ ते ३ दिवस पोलिस कोठडीही सुनावण्यात आली.