मंगलवार, 22 जुलाई 2008

लोकशाहीच्या मंदिराला काळीमा

नवी दिल्‍ली, २२ जुलै-संसदेच्या इतिहासात धक्कादायक अशी घटना आज घडली.सरकारकडून मतदान करण्यासाठी आपल्‍याला २५ कोटीची लाच देण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप भाजपचे मुरैना (मध्य प्रदेश) येथील खासदार अशोक अर्गल यांनी केला आणि आरोपाच्या पुष्ट्यर्थ त्यांनी नोटांची बंडलेच लोकसभेत आणली.
अर्गल यांच्या कृतीने लोकसभेत जोरदार गोंधळ सुरू झाला। भाजपसह विरोधी पक्षाने सरकारला धारेवर धरले. या गोंधळातच सभापती सोमनाथ चटर्जी यांनी संसदेचे कामकाज स्थगित केले. दरम्यान, डाव्या पक्षाचे नेते ए. बी. बर्धन यांनी खासदारांना विकत घेण्यासाठी २५ कोटी रूपयांचे आमीष दाखविण्यात येत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर अर्गल यांनी थेट पैशांचे पुडकेच लोकसभेत आणून या आरोपांची पुष्टी केली. आपल्याला ४ फिरोजशहा रोड येथे पैसे देण्यात आल्याचे अर्गल यांचे म्हणणे आहे.
झारखंड मुक्ती मोर्चाच्या खासदारांना पी। व्ही. नरसिंहराव यांच्या काळात खरेदी करण्यात आले होते, तसेच हे प्रकरण असून त्याची सखोल चौकशी व्हायला हवी, अशी मागणी भाजप नेते लालकृष्ण अडवानी यांनी केली. खासदारांचा घोडेबाजार होतो आहे, हे आम्ही म्हणत होतोच, त्याला आता पुष्टी मिळाली आहे, असेही ते म्हणाले.मध्य प्रदेशातील आणखी एका खासदारासह भाजपच्या एकूण तीन खासदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगून त्यात एका टिव्ही चॅनेलच्या बातमीदाराची मदत घेण्यात आल्याचेही अडवानी यांनी सांगितले.
दुसरीकडे लालूप्रसाद यादव यांनी हा अडवानी यांनी रचलेला कट आहे, असे सांगितले. सकाळी खासदार पप्पू यादव याने आपल्याला खरेदी करण्यासाठी पैशांचे आमिष दाखविल्याचा आरोप केल्यानंतर अडवानी संसदेतून गायब झाले होते. या काळात त्यांनी हा कट रचल्याचा आरोप त्यांनी केला. संबंधित खासदाराची नार्को टेस्ट करावी अशी मागणीही त्यांनी केली.

रालोआपेक्षा संपुआ सरकार विकासाचे - चिदंबरम

संयुक्‍त पुरोगामी आघाडी सरकार हे विकासाचे सरकार असून सरकारने साडेचार वर्षांत देशात मोठया प्रमाणावर विकासाच्‍या योजना राबविल्‍या आहेत. शेतक-यांसाठी आणि कृषी क्षेत्रासाठी सरकारने भरीव काम केले आहे. त्‍यामुळे हे सरकार यापूर्वीच्‍या राष्‍ट्रीय लोकशाही आघाडी सरकारपेक्षा कैकपटीने चांगले असल्‍याचा दावा अर्थमंत्री पी.चिदंबरम यांनी विश्‍वासमत ठरावात सरकाची बाजू मांडताना केला.
शेतक-यांची आत्‍महत्‍या हे सरकारचे अपयश असल्‍याचे मला मान्‍य आहे. मात्र गेल्‍या वर्षी शेतक-यांना सरकारने ६६ हजार कोटींची कर्जमाफी दिली. गेल्‍या चार वर्षांपासून राष्‍ट्रीय विकासाचा दर ८.९ टक्‍के राखण्‍यात सरकारला सातत्‍याने यश आल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.
विश्‍वासमत ठरावा संदर्भात संसदेचे विशेष अधिवेशन सुरू असून ठरावाच्‍या संदर्भात मतदानापूर्वी चिदंबरम यांनी सरकारने केलेल्‍या विकास कामांचा पाढा वाचून दाखविला. राष्‍ट्रीय विकासाचा दर, कृषीक्षेत्रासाठी केलेली भरीव तरतुद यासह सरकारच्‍या कामातील पारदर्शकतेबाबत त्‍यांनी मुददेसूद भाषण केले. सरकारने प्रत्‍येक गोष्‍ट पारदर्शीपणे केली. भारत महासत्‍ता व्‍हावा असा कॉंग्रेसपक्षाचा प्रयत्‍न आहे. त्‍यामुळे अणू करार हा देशहिताचा आहे आणि तो देशाचे हित जोपासून करण्‍याची गरज असल्‍याचा पुनरुच्‍चारही त्‍यांनी केला.
सभागृहात त्‍यांचे भाषण सुरू असताना ब-याच वेळा गोंधळ झाला. सभापतिंनी वारंवार समज देउनही सदस्‍यांनी सभागृहात गोंधळ सुरूच ठेवल्‍याने त्‍यांच्‍या भाषणात वारंवार व्‍यत्‍य आणण्‍याचा प्रयत्‍न विरोधकांनी केला.