शुक्रवार, 22 अगस्त 2008

दुहेरी बॉम्बस्फोट खटल्यात भुजबळांची साक्ष

मुंबई, २२ ऑगस्ट - गेटवे ऑफ इंडिया आणि झवेरी बाजार येथे पाच वर्षांपूर्वी झालेल्या दुहेरी बॉम्बस्फोटाच्या खटल्यात तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळ यांनी आज विशेष पोटा न्यायालयात साक्षीदार म्हणून हजेरी लावली।
विशेष न्या। एम. आर. पुराणिक यांच्यापुढे आज या खटल्याची सुनावणी झाली. गेटवे आणि झवेरी बाजार येथे दुहेरी बॉम्बस्फोट घडल्यानंतर (२५ ऑगस्ट २००३) पोलिस आयुक्तालयातून वेळोवेळी काढण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकांबाबत माजी पोलिस आयुक्त रणजितसिंग शर्मा यांची साक्ष यापूर्वी नोंदविण्यात आली होती. अटक आरोपी अश्रत अन्सारी, सय्यद अनिस आणि फमिदा सय्यद यांच्याकडून जिलेटीनच्या कांड्या जप्त करण्यात आल्या होत्या, असे शर्मा यांनी त्या वेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत (१ सप्टेंबर २००३) सांगितले होते. या परिषदेला भुजबळही उपस्थित होते. मात्र या आरोपींची अटक गुन्हे शाखेने ३१ ऑगस्टला कागदोपत्री दाखविली आहे, असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताबाबत भुजबळ यांची साक्ष नोंदविण्यात आली.
प्रसिद्धिमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेली माहिती पोलिस आयुक्तांनी दिल्याची शक्‍यता नाही, असे भुजबळ यांनी न्यायालयाला सांगितले. पत्रकार परिषदेत तारखेचा उल्लेख झाल्याबाबतही त्यांनी संदिग्धता व्यक्त केली. यासंबंधित अधिक तपशील मात्र ते देऊ शकले नाहीत.

करीमुल्ला खानला "सीबीआय' कोठडी

मुंबई, २२ ऑगस्ट- मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी करीमुल्ला खान याला येत्या २९ ऑगस्टपर्यंत केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) कोठडीत ठेवण्याचे आदेश शुक्रवारी विशेष "टाडा' न्यायालयाने दिले। करीमुल्ला खानला गुरुवारी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नालासोपाऱ्यातून अटक केली होती.
या बॉम्बस्फोटांच्या आधी रायगडमधील किनाऱ्यावर स्फोटके उतरवून घेण्यात आणि ते मुंबईपर्यंत आणण्यात खान याचा सहभाग होता, असे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. बॉम्बस्फोटांनतर तो फरारी झाला होता. या काळात त्याने दाऊद इब्राहिमच्या कराचीतील निवासस्थानी काम केले होते.

भूकंपाच्या भितीने लातूरकरही जागे!

लातूर - शुक्रवारी पहाटे चार वाजता भूकंप होणार आहे, जागे रहा, घराच्या बाहेरच बसा, अशी अफवा पसरल्याने संपूर्ण रात्र लातूरकरांनी अक्षरशः जागून काढली। अनेक नागरिक रस्त्यावरच येऊन बसले होते. नागरिकांत एक प्रकारची भीती परसरली होती. पण भूकंप न झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्‍वास टाकला.
पंधरा दिवसांपूर्वी अशाच अफवेने लातूरकरांना जागवले होते। गुरुवारी रात्री नागरिक आपल्या घरात झोपले होते. दीड-दोनच्या सुमारास अचानक पहाटे भूकंप होणार आहे जागे रहा, अशी अफवा पसरली. पाहता पाहता ही अफवा संपूर्ण लातूरमध्ये गेली. प्रत्येकांनी आपल्या नातेवाईकांना जीव वाचविण्यासाठी ही माहिती दूरध्वनी, मोबाईलवरून देण्याचा प्रयत्न केला.
अनेकांनी मित्रांना फोन करून याची माहिती दिली. एक दीड तासांत ही बातमी सगळ्या नगरात गेली. त्यामुळे नागरिकांत एकच भीती पसरली. जे शेजारी झोपेत होते, त्यांना देखील उठविण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. बहुतांश नागरिक रस्त्यावरच येऊन बसले होते. रात्रभर भूकंप हा एकच चर्चेचा विषय होता.

अत्राम यांचा अर्ज मुंबई न्यायालयानेही फेटाळला

मुंबई, २२ ऑगस्ट-राज्याचे माजी परिवहन मंत्री धर्मराम बाबा अत्राम यांचा जामीन अर्ज पुण्यातील न्यायालयाने फेटाळला असताना आता मुंबई उच्च न्यायालयानेही अत्राम यांचा अर्ज फेटाळून लावत त्यांना 28 ऑगस्ट पर्यंत वनखात्यापुढे हजर होण्याचे आदेश दिले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून अत्राम फरार असून, वनखाते त्यांचा शोध घेत आहे. अत्राम यांच्यावर चिंकाराची शिकार केल्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यानंतर त्यांच्या विश्रामगृहातून चिंकाराचे अवशेषही वनखात्याने जप्त केले आहेत.
यानंतर आपल्याला अटक होईल या भीतीने अत्राम यांनी पुणे न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. पुणे न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला होता. अत्राम हे तेव्हा पासूनच फरारी असून, त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजेही ठोठावून पाहिले परंतु आज उच्च न्यायालयानेही त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

दाऊद आणि कंपनी पाकिस्तानातच!

मुंबई, २२ ऑगस्ट-संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या १९९३ मधील मुंबई बॉम्बस्फोटांत महत्त्वाची भूमिका बजावणारा फरार आरोपी करीमऊल्ला खान ओसाम खान तब्बल १५ वर्षांनी, गुरुवारी नालासोपाऱ्यात क्राइम ब्रँच युनिट सहाच्या हाती लागला. सध्या इस्टेट एजंट म्हणून काम करणाऱ्या आणि अजूनही थेट दाऊद इब्राहिमच्या संपर्कात असलेल्या खानच्या अटकेनंतर हाती लागलेल्या माहितीमुळे दाऊद आणि कंपनी पाकिस्तानमध्येच मुक्कामाला असल्याच्या भारताच्या म्हणण्याला पुष्टी मिळाली आहे.
मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्यासाठी शेखाडीत शस्त्रे तसेच आरडीएक्स उतरले ते खानच्याच देखरेखीखाली। शेखाडीतून हा साठा मुंब्रा ते वांदे तलाव आणि पुढे टायगर मेमनच्या माहीममधील बिल्डिंगमध्ये नेण्याची जबाबदारीही त्याने पार पाडली. दाऊदचा हस्तक एझाझ पठाणचा उजवा हात समजला जाणारा खान स्फोटानंतर जून ९३मध्ये दुबई आणि नंतर थेट कराचीत दाऊदच्या आश्रयाला गेला. तिथे दाऊद, अनीस यांच्या घरीच त्याचा मुक्काम होता. या दोघांचा बॉडीगार्ड म्हणून काम करणाऱ्या खानकडे त्यांचे फोन घेणे, महत्त्वाचे मेसेज त्यांना देणे अशाही जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या. भारतातील युवकांना पाकिस्तानात घातपाती प्रशिक्षणास पाठवण्याचेही काम तो करीत होता. त्याच्यावर केंदीय अन्वेषण विभागाने पाच लाखांचे इनाम ठेवले होते.
फेब्रुवारी २००६मध्ये खान कराचीतून काठमांडू आणि तिथून भारतात परतून मिरारोडला आला. पुढे नालासोपाऱ्यातील समेळपाड्यात पत्नी, तीन मुले, मुलीसह त्याने मुक्काम ठोकला. युनिट सहाचे प्रमुख अन्सारी पीरजादे, सतीश गोवेकर, एपीआय पंढरीनाथ वाव्हळ, निकम, साळसकर, नेमळेकर, प्रदीप कदम यांनी गुरुवारी त्याच्या मुसक्या बांधल्या, अशी माहिती पोलिस सहआयुक्त (गुन्हे) राकेश मारिया यांनी दिली. खानला शुक्रवारी विशेष टाडा कोर्टात हजर करण्यात येणार असून नंतर सीबीआयकडे सुपूर्द करण्यात येईल.

सरकारच्या नाकर्तेपणामुळेच मराठी माणसावर अन्याय - राज ठाकरे

उस्मानाबाद, २२ ऑगस्ट - सरकार व विरोधीपक्ष यांच्या नाकर्तेपणामुळेच महाराष्ट्रात मराठी माणसावर अन्याय केला जात आहे, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.
उस्मानाबाद जिल्ह्यातील पक्षाचे आजी, माजी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी लातूरहून तुळजापूरला जात असताना राज ठाकरे यांचे गुरुवारी (ता। २१) येथे शिवाजी पुतळ्याजवळ मनसेनेच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांची संख्या पाहून तेथेच ठाकरे यांनी जाहीर सभा घेतली.
मराठवाड्यात पक्ष संघटना बांधणीसाठी मी दौऱ्यावर आलो आहे या दौऱ्यात कोठेही जाहीर सभा घेणार नाही, असे ठरविले होते, परंतु कार्यकर्त्यांनी दाखविलेले प्रेम लक्षात घेऊन सभा घ्यावी लागत आहे, असे स्पष्ट करून ठाकरे म्हणाले "लाखो मराठी तरूण बेरोजगार असताना परप्रांतीय मंडळी महाराष्ट्रात येऊन काम हिसकावून घेत आहेत। परप्रांतियाचे हे आक्रमण आपण किती दिवस सहन करायचे. परप्रांतियांना मी विरोध करतो म्हणजे देशाचे विघटन करीत आहे अशी टीका काही मंडळी करतात. भारतीय रेल्वे सर्व देशाची आहे पण नोकऱ्या देताना तेथे बिहारी व उत्तर प्रदेशातील लोकांना प्राधान्य दिले जाते हा समान विचार आहे का? असा सवाल करून ठाकरे यांनी महाराष्ट्रात उपलब्ध नोकऱ्याही मराठी तरूणांना मिळू द्यायच्या नाहीत हा या मागचा कट असल्याचा आरोप केला.
परप्रांतीय येऊन अनधिकृत झोपडपट्टी उभी करतात आपले सरकार मात्र अशा झोपडपट्टीवासीयांना २२५ चौरस फुटांचे घर मोफ त देते। मात्र राब राब राबणाऱ्या राज्यातील पोलिसांना घरे मिळू शकत नाहीत, अशी टीका करून राज ठाकरे यांनी मराठी माणसावर अन्याय होत असेल तिथे लाथ मारा, सतत जागता पहारा द्या, असे आवाहन केले.
ठाकरे यांच्यासोबत आमदार बाळा नांदगावकर, सरचिटणीस प्रविण दरेकर, शिरीष पारकर, बंटी मंजूळे, दिनेश देशमुख, सुनिल शिंदे, हेमंत पाठक आदी कार्यकर्ते होते. प्रारंभी सौ. निलाबाई विठ्ठल मंजूळे यांनी ठाकरे यांना औक्षवण केले. सायकलच्या साह्याने व्यायाम करीत वीज निर्मितीचा प्रयोग करणारा कळंब येथील युवक मधुकर बाबर याचा यावेळी ठाकरे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
ठाकरे यांचे आगमन होताच फटाक्‍यांची प्रचंड आतिषबाजी करीत ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. ठाकरे उस् मानाबादेत केवळ स्वागत स्वीकारणार, असे जाहीर झाले असताना शिवाजी चौकात प्रचंड संख्येने तरूणवर्ग जमला होता हे पाहून त्यांनी भाषण केले.