सोमवार, 25 अगस्त 2008

ममतांच्या आंदोलनाने नॅनो अडचणीत

कोलकाता, २५ ऑगस्ट-सिंगुरमधील परिस्थिती नियंत्रणात आली नाही तर नॅनो राज्या बाहेर हालवण्याचा आपला इरादा टाटा उद्योग समूहाने व्यक्त केल्याचा कोणताही परिणाम तृणमूल नेत्या ममता बॅनर्जी यांच्या सत्याग्रह आंदोलनावर झाला नसून, त्यांच्या बेमुदत आंदोलनाने आता नॅनोच्या उत्पादनाला विलंब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नॅनो प्रकल्पा बाहेर ममतांनी आपले आंदोलन सुरू केले असून, त्यांना आता समाजवादी पार्टी आणि नर्मदा बचाव नेत्या मेधा पाटकर यांनीही आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
टाटांनी नॅनोसाठी जी जमीन घेतली आहे, त्यातील ४०० एकर जमीन परत करण्याची प्रमुख मागणी ममतांची आहे.
टाटांनी या प्रकल्पासाठी १५०० कोटीची गुंतवणूक केली आहे. परंतु सिंगुरमध्ये त्यांच्या या प्रकल्पाला विरोध होत असल्याने आणि शेतकऱ्यांचे आंदोलन अधिक उग्र होत असल्याने हा प्रकल्प बाहेर नेण्याचा प्रयत्न टाटांनी सुरू केला आहे.

मारूलकरांच्या स्मृत्यर्थ कंठसंगीतासाठी सुवर्णपदक

पुणे, २५ ऑगस्ट- प्रसिद्ध संगीत समीक्षक दत्ता मारूलकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रात कंठसंगीतात एम. ए. संगीत (फायनल) या विषयात सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला "मारुलकर सुवर्णपदक' देण्यात येणार आहे.
मारूलकर यांच्या पत्नी सुलोचना मारूलकर यांनी त्यासाठी पुणे विद्यापीठाच्या कुलसचिवांकडे नुकताच एक लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. हे सुवर्णपदक २००९ या शैक्षणिक वर्षापासून देण्यात येईल, असे ललित कला केंद्राच्या संगीत विभाग प्रमुख डॉ. शुभांगी बहुलीकर यांनी सांगितले.

जयपूर बॉम्बस्फोटातील संशयिताला उत्तर प्रदेशात अटक

लखनौ - जयपूर शहरात १३ मे रोजी झालेल्या साखळी बॉंबस्फोटांसंदर्भात शाहबाज हुसैन या संशयित अतिरेक्‍याला राजस्थान पोलिसांनी सोमवारी अटक केली.
उत्तर प्रदेशातील मौलवीगंज येथून त्याला ताब्यात घेतले. तेथील पोलिसांच्या सहकार्याने राजस्थान पोलिसांनी ही कारवाई केली.
अहमदाबाद येथे २६ जुलै रोजी झालेल्या बॉम्बस्फोटातील मुख्य सूत्रधार अबू बशर याच्याशी हुसैन याचे जवळचे संबंध असल्याचे सांगितले जाते. अबू बशर याला १५ ऑगस्ट रोजी ताब्यात घेण्यात आले होते.
या अटकेमुळे राजस्थान बॉम्बस्फोटाच्या तपासाला आणखी वेग मिळेल अशी पोलिसांना आशा आहे.

"बीसीएनएल'च्या "थ्री जी' सेवेला पुण्यात प्रारंभ

पुणे, २५ ऑगस्ट - व्हिडिओ कॉल, व्हिडिओ कॉन्फरन्सिग, ऑनलाइन गेमिंग आणि वेगवान इंटरनेट सेवा यासाठी आवश्‍यक असलेल्या "थ्री जी' सेवेचा प्रारंभ भारत संचार निगम लिमिटेडच्या महाराष्ट्र परिमंडळाचे मुख्य व्यवस्थापक चंद्रप्रकाश यांच्या हस्ते सोमवारी झाला.
"बीएसएनएल'चा "प्लॅन ७२५' निवडलेल्या पुण्यातील दोन हजार ग्राहकांना ही सेवा मिळणार आहे. शहरातील दहा टॉवरच्या कार्यक्षेत्रात दोन किलोमीटरच्या अंतरातील ग्राहकांना ही सेवा मिळणार आहे. राज्यातील ५६ शहरात ही सेवा मिळणार आहे.
"थ्री जी' सेवेचा देशातील हा पहिलाच प्रयोग असल्याचे चंद्रप्रकाश यांनी यावेळी सांगितले.

काश्‍मिरात तणावाची स्थिती; यासिन मलिक यांना अटक

श्रीनगर, २५ ऑगस्ट - अमरनाथ ट्रस्टला वनजमीन देण्याच्या मुद्‌द्‌यावरून जम्मू- काश्‍मीरमध्ये निर्माण झालेली तणावाची स्थिती निवळण्याची चिन्हे नाहीत. सोमवारच्या मोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी फुटीरतावादी गटाचे नेते यासिन मलिक यांना अटक केली.
जमात-ए-इस्लामिया संघटनेचे नेते सयद अली शाह गिलानी आणि हुरियत कॉन्फरन्सचे अध्यक्ष मिरवाईज उमर फारूक यांना रविवारी रात्रीच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून राज्यातील दहा जिल्ह्यांत अनिश्‍चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तरीही शक्तिप्रदर्शनासाठी लाल चौकाकडे मोर्चा काढण्याच्या निर्धारावर फुटीरतावादी गटाचे कार्यकर्ते ठाम आहेत. त्यामुळे शहरात तणावपूर्ण वातावरण आहे.
सुरक्षिततेसाठी पोलिसांबरोबर निम-लष्करी दलाच्या तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत.

कुख्यात बंटी पोलिस चकमकीत ठार

नवी दिल्ली, २५ ऑगस्ट - दिल्लीसह उत्तर भारतात धुमाकूळ घालणाऱ्या बंटी टोळीचा म्होरक्‍या बंटी सोमवारी पहाटे पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाला. गेल्या दोन महिन्यांपासून पोलिस बंटीचा शोध घेत होते. त्याच्यावर खुनासह इतर अनेक गुन्हे दाखल होते.
दक्षिण दिल्लीतील बदरपूर भागात एका इमारतीत बंटी लपल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. पोलिसांनी पहाटे साडेपाचच्या सुमारास या इमारतीवर छापा टाकला. त्यावेळी बंटी आणि त्याचा साथीदार राजेश तिथे होते. या दोघांनी पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात बंटी आणि राजेश ठार झाले. चकमकीत तीन पोलिस कर्मचारीही जखमी झाले आहेत.

राणे-मनसेचा 'प्रसिद्धी'काला

मुंबई, २५ ऑगस्ट-सत्तेच्या हंडीतले लोणी मटकावण्यासाठी राजकारण्यांनाही डावपेचांचे थरावर थर लावावे लागतात, पण लक्ष्य साधण्यासाठी अचूक नेमही हवा. गेल्या काही वर्षांत दहिकाला उत्सवाचा नेम राजकारणी नेमका साधत आहेत. हा 'प्रसिद्धीचा उत्सव' साजरा करण्यासाठी नेत्यानेत्यांमधील चुरस कमालीची वाढू लागली आहे.
रविवारी या लढाईत महसूल मंत्री नारायण राणे आणि त्यांचे चिरंजीव नीतेश राणे यांचे शहरात तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे उपनगरांत वर्चस्व पहायला मिळाले. यंदा उत्सव मंडळांना राणे यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर बंड्या वाटल्या. राणेंचा फोटो आणि त्याखाली 'स्वाभिमानी नेता' असे लिहिलेल्या बंड्या घातलेली अनेक गोविंदा पथके शहरात फिरत होती. तर, राणे यांचे चिरंजीव नीतेश राणे यांच्या शुभेच्छा देणारी होल्डिंग खूप ठिकाणी लावलेली होती. उपनगरांत मात्र गोविंदा पथकांच्या बंड्यांवर मनसेचे झेंडे आणि राज ठाकरे यांचे नाव झळकत होते.
काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, मनसे या सर्वच राजकीय पक्षांनी उत्सव मंडळांना लाखोंची बक्षिसे जाहीर केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सचिन अहिर यांच्या 'संकल्प प्रतिष्ठान'च्या वतीने वरळीत दहीहंडी उत्सवाने मोठी गदीर् खेचली. तर, धारावीत शिवसेनेचे उपविभागप्रमुख मुथ्थू थेवर, मनोहर रायबागे यांनी उभारलेली एक लाख ११ हजार १११ रुपयांची हंडी वडाळा येथील 'श्री साई सोशल ग्रुप'च्या गोविंदांनी फोडली. ही हंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांची झुंबड उडाली होती. प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी हजेरी लावली होती. लालबाग येथे आमदार दगडू सकपाळ यांनी उभारलेली ५१ हजार रुपयांची हंडी रात्री उशिरापर्यंत फुटली नव्हती. मात्र, ही हंडी फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुमारे १४० गोविंदा पथकांवर बक्षिसांची खैरात झाल्याने गोविंदा खूष होते. मनसेच्या वतीने चेंबूरमध्ये ११ लाख ११ हजार रुपयांची हंडी उभारण्यात आली होती. शिवसेना भवनसमोर भारतीय विद्याथीर् सेनेच्या वतीने उभारण्यात आलेल्या १ लाख ११ हजार १११ रुपयांची हंडी अनेकांचे आकर्षण ठरली होती. बघ्यांच्या गदीर्मुळे ट्रॅफिक जॅम झाले होते.