शनिवार, 16 अगस्त 2008

जितेंद्रकुमारचा बुक्का, भारतीयांना सुखद धक्का!

बीजिंग, १६ अगस्ट-भारतीय बॉक्सिंगपटू मेडल मिळविण्याच्या शर्यतीत आगेकूच करत असून अखिल कुमारनंतर ५१ किलो वजनी गटात जितेंद्रकुमारनेही उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. त्याने उजबेकिस्तानच्या तुलाश्बॉयला १३-६ अशा फरकाने पराभूत केले.
बीजिंग ऑलिंपिकमध्ये शनिवारची सुरूवात अॅथलेटिक्समध्ये काहीशी निराशाजनक झाल्यानंतर भारताच्या जितेंद्रकुमारने बुद्धी आणि कौशल्याची शानदार सांगड घालत प्रतिस्पर्धी उजबेकी बॉक्सरला चांगले नमोहरम केले. या लढतीत आक्रमणाबरोबरच बजावही तितका सुंदर केल्याने त्याला हे यश मिळवता आले.
चार राउंडमध्ये झालेल्या या लढतीत पहिल्याच राउंडमध्ये जितेंद्रने ४-१ अशी आघाडी घेतली. तुलाश्बॉय याला तीन राउंडपर्यंत केवळ तीनच अंक मिळवता आले. त्यामुळे तो लढतीत अनेकवेळा वैतागला आणि चिडून त्याने जितेंद्रकुमार याला दोनवेळा खाली पाडले. परंतु, त्याच्या या आक्रमतेला मनोधर्याने आणि चतुराईने सामना करत जिंतेद्रने विजश्री खेचून आणला.
आता पुढील सामना जिंकल्यावर जितेंद्र कुमारलाही निश्चित पदक मिळू शकते. आता भारतीय क्रीडा रसिकांच्या नजरा अखिलकुमारनंतर जितेंद्रकुमारवरही लागून राहिल्या आहेत.

आज मंत्री आहे...उद्याचे काही सांगता येणार नाही - राणे

सावंतवाडी, १६ अगस्ट - ""मी आज सिंधुदुर्गचा पालकमंत्री आहे; पण उद्या असेन की नाही, हे सांगता येणार नाही. सिंधुदुर्गच्या विकासासाठी मात्र कायम कार्यरत राहणार'' असे भावनिक उद्‌गार राज्याचे महसूलमंत्री नारायण राणे यांनी ओरोस येथे काढले.
कार्यक्रमानंतर या वक्तव्याबाबत विचारले असता, पद राहिले नाही, तरी राजकारणात मात्र असणारच असेही त्यांनी स्पष्ट केले.
राणेंनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे। यावर निर्णय घेण्यासाठी कॉंग्रेसच्या वरिष्ठ पातळीवर खल सुरू आहे. नेमक्‍या याच काळात गेले दोन दिवस राणे स्वातंत्र्यदिन कार्यक्रमासाठी पालकमंत्री या नात्याने येथे होते.
१४ ऑगस्टला एका वृत्तवाहिनीने "राणेंचा राजीनामा मंजूर झाल्याची' ब्रेकींग न्यूज दिली। यानंतर सगळ्या मिडीयाचा लक्ष राणेंच्या प्रतिक्रियेकडे लागला होता. प्रत्यक्षात ती ब्रेकींग न्यूज अफवाच असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर काल ओरोस येथे शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात राणेंनी आपण उद्या जिल्ह्याचा पालकमंत्री असेलच असे नाही. तरीही जिल्ह्याच्या विकासासाठी तत्पर राहणार. यासाठी जिल्हावासियांनी पाठिंबा द्यावा. असे आवाहन त्यांनी केले. यानंतर चहा पानाचा कार्यक्रम झाला. यातही ते नेहमी प्रमाणे "फ्रेश' मुडमध्येच होते.
जाहीर वक्तव्याबाबत विचारले असता ते फारसे बोलले नाहीत. आपण राजकारणात मात्र असणारच असेही त्यांनी अगदी आत्मविश्‍वासाने सांगीतले. यानंतर दोन -तीन तासातच मुंबईला रवाना झाले.

गुजरात स्फोटांमागे 'सिमी'चाच मास्टरमाइंड

अहमदाबाद, १६ अगस्त-संपूर्ण देशाला हादरवून टाकणा-या अहमदाबाद तसेच जयपूरमधील विध्वंसकारी बॉम्बस्फोटांचा गुंता सोडवण्यात गुजरात पोलिसांना अखेर यश आले आहे. बंदी घातलेल्या ‘ सिमी ’ या अतिरेकी संघटनेनेच हे बॉम्बस्फोट घडवल्याचे उघड झाले आहे. इंडियन मुजाहिद्दीन ही संघटना सिमीचाच एक भाग असल्याचा दावा करतानाच , या कटाचा मास्टरमाइंड ‘ सिमी ’ कार्यकर्ता मुफ्ती अबु बशीर याला उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली आहे.
गुजरातचे पोलिस महासंचालक पी। सी. पांडे यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन बॉम्बस्फोट कटाच्या सुत्रधारांना अटक करण्यात आल्याचे जाहीर केले. अहमदाबाद , जयपूरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांमागे सिमी संघटनेचे अतिरेकीच असल्याचा ठाम दावा त्यांनी यावेळी केला. सिमी या संघटनेवर बंदी घातली असल्याने इंडियन मुजाहिदीन नावाने त्यांच्या कारवाया सुरु होत्या. या कटाचा मुख्य सुत्रधार अबु बशीर याला आज उत्तर प्रदेशातील आजमगढ येथून अटक करण्यात आली. त्याशिवाय याआधीच सफदर नागोरी या सिमीच्या प्रमुखाला ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी आतापर्यंत दहा आरोपींना केरळ , कर्नाटक , महाराष्ट्र आणि गुजरातच्या विविध भागांतून अटक करण्यात आली आहे , असे पांडे यांनी सांगितले.
गुजरातमध्ये बॉम्बस्फोट घडवण्यासाठी तब्बल ४० जणांना खास ट्रेनिंग देण्यात आली होती. केरळच्या जंगलामध्ये त्यांना ट्रेनिंग देण्यात आले. बॉम्बस्फोटांचा कट आखण्यासाठी बडोदा , मुंबई आणि अहमदाबाद येथे सिमी कार्यकर्त्यांच्या बैठका झाल्या. यातील एक बैठक युनूस याच्या घरी झाली होती. एप्रिल २००८ मध्ये हा कट आखण्यात आला. स्फोटांसाठी वापरण्यात आलेली स्फोटके बाहेरच्या राज्यातून आणण्यात आली. त्यांची जुळणी मात्र अहमदाबादमध्ये करण्यात आली , अशी माहिती पोलिसांनी दिली. या कटाचा तपास करण्यात राजस्थान व महाराष्ट्र पोलिसांनीही मोलाची मदत केल्याचे त्यांनी सांगितले.

"याहू'ला "बॉम्बे'चे मुंबई करावे लागले!

पुणे, १६ अगस्ट- "बॉम्बे'चे मुंबई होऊन आता जवळपास एक तपाहून जास्त काळ लोटला आहे. तरीही काही संकेतस्थळांवर अजूनही मुंबईचा उल्लेख बॉम्बे असाच केला जातो. काही जागरूक वाचक "बॉम्बे'चा उल्लेख मुंबई करून घेण्यासाठी आजही प्रयत्नशील आहेत. वैभव देशपांडे हा त्यापैकीच एक. त्याच्या जागरूकतेमुळे "याहू'लाही "बॉम्बे'कडून मुंबईकडे वळावे लागले.
झाले असे की, बीजिंग ऑलिंपिकचे वृत्त देताना "याहू डॉट कॉम'वर मुंबईचा उल्लेख "बॉम्बे' केला असल्याचे देशपांडे याच्या लक्षात आले। त्याने तातडीने "याहू'शी संपर्क साधला आणि मुंबई हेच आता या शहराचे अधिकृत नाव असल्याचे त्यांच्या लक्षात आणून दिले. विशेष म्हणजे "याहू'नेही ही आपली चूक लगेचच मान्य केली आणि त्वरित दुरूस्त करण्याचे आश्‍वासनही दिले.
इतरांच्या भाषेबद्दल किंवा संस्कृतीबद्दल द्वेष बाळगण्यापेक्षा आपण आपल्या भाषेबद्दल, संस्कृतीबद्दल जागरुक असले पाहिजे. कारण आपण स्वतःच्या भाषेचा आदर केला, तरच इतर लोक त्याचा आदर करतील, असे वैभवला वाटते.

गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात हिवरे बाजार ग्रामपंचायत प्रथम

पुणे- १६ अगस्त- महाराष्ट्र शासनाच्या गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान २००६-०७ चे निकाल काल स्वातंत्र्यदिनादिवशी जाहीर झाले।
यावर्षी पहिले तीनही क्रमांक हे विभागून देण्यात आले आहेत.
प्रथम क्रमांक अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे-बाजार ग्रामपंचायतीला आणि सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्‍यातील कोरेगाव ग्रामपंचायतीला विभागून मिळाला।
द्वितीय क्रमांक (विभागून)- आसगाव (ता. सातारा, जि. सातारा), चिचिटोला (ता. खडक-आर्जुणी, जि. गोंदिया)
तृतीय क्रमांक (विभागून)- साहिले (ता।संगमेश्‍वर, जि. रत्नागिरी) ,चाफ्याचा पाडा (ता. सटाणा, जि. नाशिक)
ईश्‍वरभाई पटेल, चंदीचरण बेग आणि शहाजी क्षीरसागर यांच्या त्रिस्तरीय समितीने अभियाना अंतर्गत गावांची पहाणी केली होती.

चंद ग्रहणाबद्दल गैरसमज नको

नाशिक, १६ अगस्त-रक्षाबंधन आणि चंदग्रहण एकाच दिवशी येत असले, तरी ग्रहणाचे वेध हे दुपारी तीन वाजून ५४ मिनिटांपासून सुरू होत आहेत. त्यामुळे दुपारपर्यंतचा काळ हा शुभ आहे, त्यावेळेत पूजाअर्चा व रक्षाबंधन करण्यास काहीच अडचण नाही, असे आवाहन सनातन वैदिक धर्मसभेचे अध्यक्ष भालचंद शौचे यांनी केले आहे.
शनिवारी रक्षाबंधनाच्या दिवशी खंडग्रास चंदग्रहण आहे। ग्रहण उत्तररात्री एक वाजून सहा मिनिटांपासून पहाटे चार वाजून १५ मिनिटांपर्यंत राहील. या ग्रहणाचे वेध शनिवारी दुपारी तीन वाजून ५४ मिनिटांपासून लागतील. वेध लागल्यापासून ते ग्रहण सुटण्यापर्यंतचा काळ कुठल्याही शुभ कार्यासाठी अशुभ मानला जातो. त्यामुळे रक्षाबंधनाबाबतदेखील लोकांमध्ये तर्कवितर्क लावले जात आहेत.
शनिवारी पहाटेपासून ते दुपारपर्यंतच्या वेळेत (वेधापूवीर्ची) पूजाअर्चा, जप, होमहवन, भोजन व रक्षाबंधनास काहीही अडचण नाही, असेही शौचे यांनी सांगितले.