अहमदाबाद, २६ जुलै-व्यावसायिकांचं शहर म्हणून ओळखल्या जाणा-या अहमदाबादमध्ये आज १७ बाँबस्फोट झाल्याचं समजतं. त्या सर्व स्फोटांना प्रशासनाने दुजोरा दिलेला नाही. कमी तीव्रतेचे हे स्फोट असून त्यात १५ जण मृत्युमुखी पडले असून ३० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत.
संध्याकाळी सातच्या सुमारास मणिनगरमध्ये पहिला स्फोट झाला आणि त्यापाठोपाठ सरदार पटेल डायमंड मार्केट, सरनपूर ब्रिज आणि इशानपूर, बापूनगर आणि रायपूर इथे आठ-दहा मिनिटांत एकापाठोपाठ एक स्फोट झाले. ही सर्व ठिकाणी नेहमीच गजबजलेली असतात.
एक बाँब सायकलवर ठेवला होता आणि दुसरा बाँब टिफिनमध्ये लपवण्यात आला होता, असं प्राथमिक वृत्त आहे. एक स्फोट बसमध्ये झाल्याचं समजतं. स्फोटाचं वृत्त कळताच, पोलिस आणि प्रशासन लगेचच घटनास्थळी पोहोचलं असून जखमींना हॉस्पिटलमध्ये हलवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू झालं आहे.
संपूर्ण गुजरातमध्ये हाय alart जाहीर करण्यात आला असून दिल्ली, मुंबई आणि संवेदनशील शहरांमध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी या हल्ल्यांचा तीव्र निषेध केला असून नागरिकांना शांततेचं आवाहन केलं आहे. तर दुसरीकडे, या स्फोटानंतर काँग्रेस विरुद्ध भाजप असं राजकारण रंगू लागलं आहे. चूक कुणाची?, केंद्राची की राज्याची यावरून आता आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत.
कर्नाटकपाठोपाठ गुजरात लक्ष्य झाल्यानं भाजपशासित राज्यच टार्गेट का ?, असाही प्रश्न चर्चिला जात आहे. १५ ऑगस्टदरम्यान कमी तीव्रतेचे स्फोट करून देशवासियांमध्ये घबराट पसरवण्याचा हा दहशतवादी यंत्रणेचा प्रयत्न असल्याचं बोललं जातंय.