मंगलवार, 5 अगस्त 2008

कॅटरिना - सलमानला पटवले शाहरूखला कटवले !

मुंबई, ५ अगस्ट- मध्यंतरी वाढदिवसाच्या पार्टीत सलमानखान आणि शाहरुख खान यांच्यात झालेल्या वादानंतर कॅटरीना कैफ सलमानवर नाराज झाली होती. त्यामुळे ती बॉयफ्रेंड' सलमानखानशी असलेली मैत्री तोडणार असा समज सगळीकडे पसरला होता. पण या समजाला कॅटरीनाने मंगळवारी छेद दिला. त्यामुळे नुकत्याच झालेल्या "फेंडशिप डे'च्या पार्श्‍वभूमीवर या दोघांचे पुन्हा जुळल्याची चर्चा आहे.
"आमच्याबद्दल कुणीतरी उगाचच गैरसमज पसरवीत असून मी सलमान खानबरोबर असलेले "प्रोफेशनल' संबंध अजून तोडलेले नाही'' असे स्पष्टीकरण कॅटरिनाने केले। एका कार्यक्रमानंतर ती पत्रकारांशी बोलत होती" चांगली स्क्रिप्ट असेल तर मी नक्कीच सलमानखान बरोबर चित्रपटात काम करेल। तसेच आमच्या तारखा जुळल्या तर सोहेल खानच्या पुढच्या सिनेमात आम्ही नक्की एकत्र येऊ'' असेही कॅटरिना म्हणाली.
मात्र वेळेअभावी शाहरुख खानच्या "टेंप्टेशन' या कार्यक्रमात आपण काम करणार नाही असेही कॅटरिनाने यावेळी जाहीर केले। लवकरच यशराज फिल्मच्या एका चित्रपटाच्या शुटिंगसाठी दीर्घकाळासाठी आपण अमेरिकेत जाणार आहोत असे ती म्हणाली.
"सिंग इज किंग' या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पार्श्‍वभूमीवर तिने अक्षयकुमारची बऱ्यापैकी स्तुती केली. अक्षय कुमार या चित्रपटात तिचा सहकलाकार आहे.

लातूरमध्ये संभाजी ब्रिगेडचा राडा?

लातूर, ५ अगस्ट- मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडने लातूरमध्ये सरकारी गाड्या पेटवल्या , असे म्हटले जातेय. घटनास्थळी मराठा समाजाला आरक्षणासंदर्भात संभाजी ब्रिगेडची पत्रकं सापडल्याने पोलिस त्यादिशेने तपास करत आहेत.
लातूरमधील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात सरकारी वाहने पार्क केली जातात। येथेच कृषी आणि मत्स्य विभागाच्या दोन जीप लावण्यात आल्या होत्या. पण रात्री या दोन्ही जीप अनोळखी व्यक्तींना येऊन पेटवून दिल्या.
या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तिंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील एक जीप पूर्णपणे जळली आहे. दुसरीच्या काचा फोडून ती जाळण्याचा प्रयत्न झाला.

कोल्हापुरात आगीत घर जळून खाक

कोल्हापूर, ५ अगस्ट- लक्ष्मीपुरीतील कोंडाओळ येथील मेहता यांच्या बंद घराला मंगळवारी सकाळी पावणेदहा वाजता भीषण आग लागली. बघता बघता आगीने रौद्र रुप धारण केले.
आगीच्या ज्वाला सुमारे पंधरा ते वीस फूट उंच गेल्या. अग्निशामक दलाला याची माहिती मिळताच आगीचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी खिडकींच्या काचा फोडून घरात पाणी मारून आग आटोक्‍यात आणली.
भरवस्तीत लागलेल्या आगीमुळे नागरिकांची तारांबळ उडाली तसेच या मार्गावरून जाणारी वाहतुक काही काळ विस्कळीत झाली.
आगीचे नेमके कारण शोधण्याचे व नुकसान किती झाले, याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे.

पुन्हा अफगाणिस्तान उभा करू- राष्ट्रपती

नवी दिल्ली, ५ ऑगस्ट- काबुलमधील भारतीय दूतावासावर झालेला हल्ला भ्याड असल्याचे स्पष्ट करत, अफगाणिस्तानला यापुढील काळातही भारताची मदत होतच राहणार असल्याचे राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी स्पष्ट केले. मोडलेला अफगाणिस्तान पुन्हा भारत उभा करेल असे त्या म्हणाल्या.
अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष हमिद करझाई यांच्या स्वागत प्रीत्यर्थ आयोजीत एका समारोहात त्या बोलत होत्या. भारत आणि अफगाणिस्तान या दोनही देशात मित्रत्वाचे संबंध आहेत.
हे संबंध वृद्धींगत करण्याचा भारत सातत्याने प्रयत्न करेलच परंतु अफगाणिस्तानला सर्वतोपरी मदत करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

'अमरनाथ नही, तो हज भी नही'

पुणे, ५ अगस्ट-अमरनाथ यात्रेला जमीन न देण्याच्या निर्णयाविरोधात देशव्यापी आंदोलन आणखी तीव्र करण्याची भूमिका मांडतानाच 'यदि अमरनाथ यात्रा नही, तो हज भी नही', असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे केंदीय सहमंत्री व्यंकटेश आबदेव यांनी सोमवारी दिला. हज यात्रेची सबसिडी रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली.
पाच ते आठ ऑगस्ट दरम्यान सर्व खासदारांच्या निवासस्थानी अमरनाथ यात्रा रक्षा समितीच्या वतीने मोर्चा नेण्यात येणार आहे. यात्रेच्या रक्षणासाठी त्यांनी लोकसभेत आवाज उठवावा यासाठी त्यांच्यावर दबाव आणण्यात येणार आहे. तसेच सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जम्मू ते दिल्ली दरम्यान मोर्चाचेही आयोजन करण्यात आले आहे; तर १४ सप्टेंबर रोजी 'चलो जम्मू' अशी हाक देत विराट हिंदू सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व आंदोलनांची सरकारने दखल न घेतल्यास जम्मूतील सचिवालयास अनिश्चित काळासाठी घेराव घालण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.

कॅबिनेटच्‍या बैठकीत राणे-देशमुखांत खडाजंगी

मुंबई, ५ ऑगस्ट- मुंबई- मुख्‍यमंत्री विलासराव देशमुख आणि महसूलमंत्री नारायण राणे यांच्‍यातील विळया-भोपळयाचे नाते एव्‍हना सर्वमान्‍य झाले आहे। मुंबईतील सोनियांच्‍या सभेतील गोंधळानंतर दोन्‍ही नेत्‍यांमध्‍ये झालेला वाद असो किंवा राणेंनी 'विलासराव हटावो'साठी केलेला प्रयत्‍न असो दोन्‍ही नेते कॉंग्रेस नेहमीच आमने-सामने आले आहेत. आता दोन्‍ही नेत्‍यांमधील वाद कॅबिनेटच्‍या बैठकीतूनही समोर आले आहेत.
राज्‍याच्‍या कॅबिनेटस्‍तरावरील नेत्‍यांची बैइक आज मंत्रालयात आयोजित करण्‍यात आली होती। या बैठकीत 'सिडको'ची शंभर एकर जमीन व्हिडिओकॉन उद्योगसमूहाला देण्‍याच्‍या प्रस्‍तावाबाबत चर्चा अपेक्षित होती. मात्र मुख्‍यमंत्री देशमुख यांनी मराठवाडयाच्‍या विकासासाठी या प्रस्‍तावास परस्‍पर मंजुरी दिली. या प्रकरणाचा राग येउन राणे यांनी मुख्‍यमंत्र्यांच्‍या परस्‍पर निर्णय घेण्‍याच्‍या पध्‍दतीवर तोंडसुख घेतले. तर विलासरावांनीही हा प्रस्‍ताव कॅबिनेटमध्‍ये संमत करवून घेतला आहे. यामुळे दोघांमधील वाद वाढत जाउन राणे यांनी आपला लेखी विरोध व्‍यक्‍त करीत बैठकीतून काढता पाय घेतला.
व्‍हीडीओकॉनला ही जमीन देण्‍यास महसूलमंत्री राणे यांनी देण्‍यास विरोध केला असतानाही मुख्‍यमंत्र्यांनी कॅबिनेटमध्‍ये निर्णय घेउन जमीन ३०० कोटी रुपयांत व्‍हीडीओकॉनला देण्‍याचा निर्णय घेतला आहे. ही जमीन व्‍हीडीओकॉनला ३०० कोटींमध्‍ये विक्री केली जाणार आहे.विरोध नोंदविला जाण्याची मंत्रिमंडळ बैठकीच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे.

हिंदीविरोधी आंदोलनाने नेपाळ प्रभावित

काठमांडू, ४ ऑगस्ट- नेपाळमधील कट्टर संघटनांनी हिंदीविरोधी तीव्र आंदोलन छेडल्याने भारताच्या सीमेलगतच्या तेराई पठारातील बावीस जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
उपराष्ट्रपती परमानंद झा यांनी हिंदीत शपथ घेतल्याने या वादास तोंड फुटले होते. नवनियुक्त उपराष्ट्रपतींच्या हिंदी शपथ घेण्याविरोधात थरू समुदायाच्या थरूहट संघर्ष समितीने आज बंदचे आवाहन केल्याने दक्षिण तेराई भागातील सामान्य जनजीवनास फटका बसला आहे.
झा यांनी परदेशी भाषेक शपथ घेऊन संविधानाचा अपमान केल्याचा त्यांचा आरोप आहे.