नाशिक, ११ अगस्ट - नाशिक शहराजवळील सोमवारी दिवसभरात गंगापूर धरणातून २० हजार १७८ क्युसेक्स पाणी सोडण्यात आले आले तर आळंदी धरणातून ५४८८ क्युसेक्स पाणी सोडले जात आहे।
गंगापूर धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्याची पातळी वाढत असल्याने गोदावरीला पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। गोदावरीची पातळी वाढण्याची शक्यता असल्याचे जिल्हाधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी नाशिक शहर आणि जिल्ह्यातील गोदाकाठच्या रहिवाशांना दक्षतेचा इशारा दिला आहे. पूरपरिस्थितीच्या टप्प्यात न राहता, उंचवट्याच्या ठिकाणी रहिवाशांनी स्थलांतरित व्हावे असेही जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
दरम्यान गंगापूर धरणाच्या परिसरात आज सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळात ७१ मि। मी. तर त्र्यंबकेश्वरमध्ये १६७ मि.मी. पाऊस झाला. गोदावरीला पूर आल्यामुळे नाशिक शहरातील रामकुंडाजवळ असलेल्या गोदावरीतील दूतोंड्या मारुती मूर्तीच्या डोक्यावरून पाणी वाहू लागले आहे.
गोदावरीच्या पातळीत होत असलेली वाढ आज सोमवारी सायंकाळीही कायम राहिली आहे। नाशिकपासून २५ कि.मी. अंतरावर असलेल्या गोदावरीकाठच्या सायखेडा गावाजवळच्या पुलापर्यंत पुराची पातळी भिडली आहे. पुलावरून पाणी जाऊन पातळीत वाढ झाल्यास सायखेडा चांदोरीसह इतर गावांमधील पिके पूरबाधित होण्याची शक्यता आहे.आता सुरू असलेला पाऊस कायम राहिल्यास या परिसराला पुराचा वेढा पडण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
निफाडचे प्रांत रामदास खेडकर हे सायखेडा गावाकडे रवाना झाले आहेत. पूरपरिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांनी सायखेड्यात मुक्काम करण्याचे ठरविले आहे.