गुरुवार, 17 जुलाई 2008

'वेगळ्या विदर्भास राजीव गांधी तयार होते'

स्व. पंतप्रधान राजीव गांधी यांनी वेगळा विदर्भ करण्यास तयारी दर्शविल्याचा गौप्यस्फोट माजी केंद्रीय मंत्री वसंत साठे यांनी केला आहे. त्यांनी आपल्याला तसे आश्वासन दिले होते, परंतु केवळ कॉंग्रेस हितासाठी आपण त्यांना त्यापासून काही काळासाठी परावृत्त केल्याचेही साठे यांनी स्पष्ट केले.
साठे सध्या नागपुरात असून, श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालापात त्यांनी ही माहिती दिली.
राजीव यांनी नियुक्त केलेल्या संगमा समितीने आपला अहवाल दिल्यानंतर त्यांनी आपल्याकडे वेगळा विदर्भ राज्य करण्‍याविषयीचे मत जाणून घेतले होते. तेव्हा आपण त्यांना विरोध केल्यानेच वेगळे विदर्भ राज्य न होऊ शकल्याचे साठे म्हणाले.
तत्कालीन राजकीय समीकरणे आणि कॉंग्रेसच्या हितामुळे आपण राजीव यांना यासाठी विरोध केल्याचेही साठे यांनी स्पष्ट केले. निवडणुकांनंतरची समीकरणे पाहूनच आपण वेगळ्या विदर्भाची घोषणा करावी असे त्यांना आपण सुचवले होते. मात्र, नंतर राजकीय समीकरणे बदलत गेली आणि कॉंग्रेसची सत्ताही गेल्याने हा विषय मागे पडल्याचे ते म्हणाले.
सध्या अणू कराराबाबत नाहक वाद केला जात आहे. हा करार देश हितावह असल्याचेही साठे यांनी स्पष्ट केले.

कोई टिप्पणी नहीं: