शनिवार, 28 जून 2008

पोलीसांनी दखल न घेतल्याने महिलांनीच केले दारूअड्डे उद्‌ध्वस्त!

आष्टी - तालुक्‍यातील धानोरा, पिंपळा आणि अंभोरा येथील महिलांनी दारूबंदीसाठी आक्रमक पवित्रा घेऊन आंदोलन सुरू केले आहे।
महिलांनी १९ जूनला अंभोरा पोलिसांकडे निवेदन देऊन दारूबंदीची मागणी केली होती; परंतु दारू विक्रेत्यांवर कारवाई झाली नाही। त्यामुळे या महिलांनी ग्रामपंचायत सदस्य अनसूया शेळके व किसनाबाई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी रात्री गावातच मोर्चा काढला आणि गावातील तब्बल ११ दारूअड्डे उद्‌ध्वस्त केले.
गावकऱ्यांनी या आंदोलनाचे स्वागत केले। ज्या ज्या गल्लीत हा मोर्चा जाईल तिथे तिथे फटाके वाजवून महिलांचे स्वागत केले. काही तरुणांनी गावातील मटक्‍याच्या साहित्याची होळी केली. त्यामुळे गावात आता दारूबंदीबरोबर मटकाबंदीही झाली आहे.
पिंपळा येथेही महिलांनी गावातील तळिरामांची धुलाई केली, तसेच अंभोरा पोलिसांमार्फत गावातील दारू विक्रेत्यांवर कारवाई केली. अंभोरा येथील महिलांनीही शुक्रवारी गावातील पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला आणि पोलिसांना दारू विक्रेत्यावर कारवाई करण्यास भाग पाडले. त्यामुळे या तिन्ही गावांत दारूबंदी झाली आहे.
आता गावातील महिलांनी पाणंदमुक्त गाव करून निर्मलग्रामकडे वाटचाल करण्याचा निर्धार केला आहे. धानोऱ्यात तळिराम आढळल्यास त्याचे मुंडन करण्यात येणार आहे. अंभोरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत कुणी अवैध दारूविक्री करीत असेल तर २४११३३ या क्रमांकावर फोन करून कळविण्याचे आवाहन अंभोऱ्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुडके यांनी केले आहे.

कोई टिप्पणी नहीं: