गुरुवार, 28 अगस्त 2008

सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्र विक्रीस काढला - नितिन गडकरी

जळगाव, २९ ऑगस्ट- - राज्यात वीज भारनियमनात दिवसेंदिवस वाढ होत आहे. तब्बल पंधरा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तर कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. अशी परिस्थितीत असतानाही राज्यातील मंत्री त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.
सध्या त्यांच्यात जमीन विक्रीसाठी स्पर्धा सुरू आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या या सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्र विक्रीस काढला आहे. असा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांनी केला.
महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी ते गुरुवारी जळगाव आले होते। हॉटेल रॉयल पॅलेस येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पांडुरंग फुंडकर, जिल्हाध्यक्ष आमदार गिरीश महाजन, प्रदेश सरचिटणीस सुनील बढे, डॉ. राजेंद्र फडके, सुनील नेवे, आमदार अरुण पाटील उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, की सत्तेवर असलेल्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मंत्र्यांनी जळगाव येथील सभेत सत्ता मिळाल्यास शहराचा कायापालट करण्यात येईल, असे आश्‍वासन दिले आहे। परंतु याच मंत्र्यांनी गेल्या आठ वर्षात सत्ता असतानाही महाराष्ट्राचा कोणताही कायापालट केला नाही. त्यामुळे त्यांच्या या आश्‍वासनावर जनतेने विश्‍वास ठेवू नये. राज्यातील कायदा सुव्यवस्थेची स्थिती ढासळली आहे. बॉम्बस्फोट होत आहे दर तीन तासांनी एक खून होत आहे. तर राज्यात शेतीची परिस्थिती अत्यंत खराब आहे.
केंद्रातील सरकारनेही शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. महापालिकेतील गैरव्यवहार प्रकरणी जाहीर झालेल्या सोनी समितीच्या अहवालाबाबत बोलताना ते म्हणाले, की समितीच्या शिफारशी शासनाने स्वीकारल्या आहेत. त्यामुळे विधिमंडळात त्यावर चर्चेची गरज नाही. त्यामुळे आता केवळ कारवाईच आवश्‍यक आहे. शासनाने तातडीने कारवाई करावी याचा पाठपुरावा आपण करणार आहोत असेही त्यांनी सांगितले. महापालिकेत भाजप सत्तेवर आल्यास नागपूर प्रमाणेच येथेही विकास करण्यात येईल असे आश्‍वासनही गडकरी यांनी दिले.

कोई टिप्पणी नहीं: