नवी मुंबई, २३ ऑगस्ट- वाहतूक पोलिसांनी महिनाभर राबविलेल्या 'झिरो टॉलरन्स' मोहिमेमुळे रस्ता अपघातांच्या प्रमाणात २६ टक्क्याने तर अशा अपघातांत मृत पावणा-यांच्या प्रमाणात २४ टक्क्याने घट झाल्याचा दावा नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी केला आहे.
मद्यप्राशन करून वाहन चालवणे, वेग मर्यादेचे उल्लंघन करणे, अवैध प्रवासी वाहतूक व शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून विना लायसन्स व अतिवेगाने वाहने चालविण्याच्या प्रकारांमुळे अपघाताच्या संख्येत प्रचंड वाढ झाली होती. या बाबी विचारात घेऊन अपघातांना आळा घालण्याच्या दृष्टीने पोलिस आयुक्त रामराव वाघ यांनी वाहतूक शाखेला सूचना केल्या होत्या. त्यानुसार पोलिस उपायुक्त एन. डी. चव्हाण (मुख्यालय), वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त धिवरे व वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद जाधव यांनी २० पोलिस अधिकारी व ६० पोलिस कर्मचा-यांच्या सहाय्याने गेला महिनाभर 'झिरो टॉलरन्स' मोहीम उघडली होती.
या मोहिमेत मद्यप्राशन करून वाहन चालविणा-यांविरुद्ध ९६ केसेस दाखल करून त्यांच्याकडून दंड वसूल केला. तसेच वेग मर्यादेचे उल्लंघन करणा-यांविरोधात ३३५३ केसेस दाखल करून ६,७९,७०० इतका दंड वसूल केला. त्याचप्रमाणे विना लायसन्स गाडी चालवणा-या शाळा - कॉलेजच्या विद्यार्थ्यांविरुद्ध १०३ केसेस दाखल करुन १०,३०० दंड तर अवैध प्रवासी वाहतूक करणा-यांविरुद्ध ८८१ केसेस दाखल करुन ८,६१,७०० इतका दंड वसुल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील अनेक वाहनचालकांना १ ते ३ दिवस पोलिस कोठडीही सुनावण्यात आली.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें