मुंबई, २३ ऑगस्ट-महसूलमंत्री नारायण राणे दिल्लीला बोलाविल्याशिवाय जाण्यास तयार नाहीत आणि पक्षश्रेष्ठीही दिलेला राजीनामा स्वीकारला हे सांगायला तयार नाहीत, त्यामुळे राणे आणि काँग्रेस हे दोघेही कोंडीत सापडले असून यातून कसे बाहेर पडायचे असा पेच दोघांना सतावत असल्याचे समजते.
पेचप्रसंगातून मार्ग काढण्यासाठी राणे यांनी स्वत:हून पक्षश्रेष्ठींना भेटायला जावे, असा आग्रह काही काँग्रेस नेते करीत आहेत तर चीनच्या दौ-यावर जाण्यापूर्वीच आपण सोनिया गांधी यांची भेट मागितली होती, त्यामुळे पुन्हा भेट कशी मागणार, असा पवित्रा राणे यांनी घेतला आहे. तशात राणे यांचा राजीनामा स्वीकारला तर ते कालांतराने पक्षातूनही बाहेर जातील व त्यामुळे पक्षाचे मोठे नुकसान होईल, असे काही मंत्र्यांनी प्रत्यक्ष श्रीमती गांधी यांची भेट घेऊन सांगितल्याचे कळते. त्यामुळे राणे यांचा राजीनामा स्वीकारायचा नाही, पण त्यांनी स्वत: मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा पाठविला तर तो स्वीकारायचा असा निर्णय काँग्रेसने केला आहे.
पण आपण एकदा राजीनामा दिलेला असल्याने तो स्वीकारला अथवा फेटाळला यापैकी काहीही स्पष्ट होत नसल्याने आता राणे केवळ दिल्लीच्या निर्णयाची वाट पाहत आहेत, असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. राजीनामा स्वीकारला असे सांगितले तर राणे हे दुस-या क्षणी मुख्यमंत्री अथवा राज्यपाल यांच्याकडे राजीनामा पाठवून देतील, असेही त्यांच्या समर्थकांनी सांगितले.
राणे आणि काँग्रेस या दोघांची कोंडी झालेली असताना मध्येच केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल हे त्यांना भेटून गेल्याने तसेच राणे यांनी काँग्रेस सोडली तर त्यांनी आपल्या पक्षात यावे, यासाठी अनेकजण प्रयत्नाला लागल्याने काँगेसमध्ये काहीशी चलबिचल सुरू झाल्याचे कळते. राणे आणि काँग्रेस यांच्यामध्ये सुरु झालेला पेचप्रसंग सुटला नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दरवाजे खुले आहेत, असे संकेत देण्यासाठीच पटेल हे राणे यांना भेटले असावेत, असे काँग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
राणे यांनी टोकाचा निर्णय घेऊ नये, अशी विनंती करण्यासाठी काँग्रेसच्या दोघा खासदारांनी त्यांची भेट घेतली. पाठोपाठ रिपब्लिकन पक्षाचे खासदार रामदास आठवलेही त्यांना भेटून गेले. शुक्रवारी दुपारी उद्योगमंत्री अशोक चव्हाण यांनी राणे यांची भेट घेऊन चर्चा केल्याचे कळते. याबद्दल चव्हाण यांच्याकडे विचारणा करता महसूल खात्याशी संबंधित नांदेड जिल्ह्यातील काही प्रश्न सोडविण्यासाठी भेट घेतली होती, असे ते म्हणाले.
तहसीलदारांच्या काही जागा रिकाम्या असून दुष्काळी स्थिती असल्याने त्या लवकर भराव्यात, अशी विनंती केल्याचे त्यांनी सांगितले.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें