गुरुवार, 3 जुलाई 2008

तासवडे टोलनाक्‍यावर संतप्त जमावाचा हल्लाबोल

उंब्रज, दि. 2 : तासवडे, ता. कराड येथील टोलनाक्‍यावरील कर्मचारी यांची सुरू असलेली गुंडगिरी व वाहनधारक यांना नाकारण्यात आलेली सवलत या कारणावरून उंब्रज येथील सुमारे 300 जणांच्या संतप्त जमावाने मोठ्या प्रमाणात दगडफेक करून टोलनाक्‍याची तोडफोड केली. या दगडफेकीत तीन जण जखमी झाले, तर सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले. याबाबत टोलनाका व्यवस्थापकाकडून तळबीड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली आहे. संतप्त भूमिकेमुळे या परिसरातील वातावरण बराच वेळ तणावपूर्ण होते.
टोलनाका व वाहनधारक यांचा वाद हा आता नवा राहिलेला नाही. तासवडे टोलनाक्‍यावरील ही अन्यायकारक टोलवसुली व अरेरावीबाबत या परिसरातील वाहनधारकांनी बऱ्याचवेळा आंदोलने केली आहेत. मात्र येथील परिस्थितीही ये रे माझ्या मागल्यासारखीच आहे. पी. बी. ए. कंपनीकडून तासवडे टोलनाका चालविण्याची निविदा संपल्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून उल्हासनगर येथील कोनार्क कंपनीने टोलनाका चालविण्यास घेतला आहे.
मागील कंपनीने स्थानिक वाहनधारकांच्या टोलमाफीच्या आक्रमक भूमिकेमुळे स्थानिकांना टोलमधून वगळले होते, मात्र गेल्या दोन-तीन महिन्यांपासून कोनार्क कंपनीने स्थानिकांची सवलत रद्द केली होती. टोलवसुली दरम्यान वाहनधारक व कर्मचारी यांच्यामध्ये वादावादी ही नित्याची झाली होती. गुंडशाही व अरेरावीच्या कारणावरुन येथील सुमारे ३०० जणांच्या संतप्त जमावाने टोलनाक्‍यावर दगडफेक करुन तोडफोड केली. टोलनाक्‍यावरील बुथ, संगणक आदींचे नुकसान झाले. येथील कर्मचारी हे संतप्त जमावाच्या आक्रमकतेमुळे पळून गेले.
याच दरम्यान घटनास्थळी सपोनि हरीष खेडकर, डॉ. दिगंबर प्रधान दाखल झाले व त्यांनी जमावास शांततेचे आवाहन केले. यावेळी टोलनाक्‍याचे संबंधित अधिकारी डॉ. दिगंबर प्रधान, तहसीलदार धनाजी तोरस्कर, नगरसेवक राजेंद्र यादव यांच्यासह जमावातील काहीजणांना चर्चेसाठी बोलविण्यात आले. या चर्चेदरम्यान स्थानिक वाहनधारकांना टोलमधून वगळण्यात यावे तसेच टोलनाक्‍यावर चाललेली गुंडगिरी, अरेरावी ही तात्काळ थांबवावी असे वाहनधारकांनी सांगितले. राजेंद्र यादव म्हणाले, स्थानिकांना सवलत देण्यास प्राधान्य दिले आहे, मात्र स्थानिक वाहनधारक शिवीगाळ करत आहेत.
यापुढे स्थानिक वाहनधारकांना टोलमधून वगळण्यात येणार असून गुंडगिरी व अरेरावी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. दरम्यान याबाबतची फिर्याद टोलनाक्‍यावरील मॅनेजर मूलचंद जेठवाणी यांनी तळबीड पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी जमावातील अकरा जणांसह सुमारे १२ जणांवर सार्वजनिक मालमत्तेची मोडतोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे।
तासवडे टोलनाका येथे सकाळी १० वाजता झालेल्या दगडफेकीनंतर सुमारे तीन तास टोलनाक्‍यावरील टोल आकारणी बंद होती. त्यामुळे अनेक वाहनचालक टोल न देताच जात असल्यामुळे वाहनधारकांकडून समाधान व्यक्‍त केले जात होते.

कोई टिप्पणी नहीं: