रविवार, 20 जुलाई 2008

रेंगे-पाटीलांना उचललं कुणी?

नवी दिल्ली, २० जुलै-शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास मुंबईसाठी ट्रेनमधे बसल्यानंतर परभणीचे खासदार तुकाराम रेंगे पाटील गायब झालेत. ते स्वतःच लपलेत , शिवसेनेने त्यांना गायब केलंय की नारायण राणेंनी , अशा चर्चा सुरू आहेत.
रविवारी दुपारी दिल्लीत शिवसेनेच्या संसदीय पक्षाची बैठक पार पडली। रेंगे पाटील त्याला हजर नव्हते. आमच्या अकरा खासदारांपैकी एकटे रेंगे पाटीलच आले नाहीत , असे पक्षप्रवक्ते संजय राऊत यांनी पीटीआयशी बोलताना स्पष्ट केले. रेंगे पाटलांच्या कुटुंबियांनी ते बैठकीला येत असल्याचे सांगितले होते , पण ते बैठकीला आलेच नाहीत , असेही राऊत म्हणाले.
रेंगे पाटलांच्या घरातलेही त्यांचा ठावठिकाणा सांगत नाहीत. त्यांना तो माहितच नाही , असा त्यांचा दावा आहे. शिवसेनेचे नेतेही चूप आहेत. तसेच रेंगे पाटलांशी गेले काही महिने जवळीक असलेले महसूल मंत्री नारायण राणेही याविषयी काहीच बोलायला तयार नाहीत.
यावेळी रेंगे पाटील काँग्रेसच्या बाजूने मतदान करतील , अशी खात्री सगळ्यांनाच होती. अगदी शिवसेना नेत्यांनाही होती. स्थानिक पक्षांतर्गत वादांमुळे त्यांची तिकीट कापली जाणे नक्की मानले जात होते. त्यामुळे कणकवलीत राणेंच्या गुंडांकडून मारहाण झालेले रेंगे पाटील काही महिन्यांपूर्वी राणेंच्या मुलाच्या लग्नाला हजर राहिले होते. गेले काही दिवस राणे शिवसेना खासदारांना आपल्या गळात ओढण्याच्या प्रयत्नात होते. त्यात रेंगे पाटलांशीही त्यांचा संपर्क असल्याची चर्चा खुलेआम होती. रेगेंना गायब करून थेट मतदानासाठी त्यांनी हजर केले , तर दिल्ली दरबारी त्यांची वट वाढणार आहे. तसेच रेंगेंनी मुख्यमंत्र्यांशी संधान बांधल्याच्या बातम्याही स्थानिक वृत्तपत्रांतून आल्या होत्या. त्याचाही संदर्भ या सगळ्याशी जोडून घेतला जात आहे.
दुसरीकडे शिवसेना ' गद्दारी ' शी अशाप्रकारे लढण्यात माहिर मानली जाते. शिवसेना रेंगे पाटलांच्या गायब होण्याविषयी मौन पाळून आहे , त्यामुळे हे सेनेचेच पराक्रम असावेत , अशी शंका घेतली जात आहे. रेंगे पाटलांनी काँग्रेसला मतदान करण्याऐवजी त्यांना मतदान करूच देऊ नये , असे सेनेने ठरवले असावे.

कोई टिप्पणी नहीं: