नवी दिल्ली, २० जुलै-दिल्लीच्या गादीवर हक्क सांगण्याच्या दिशेने उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी पुढचं पाऊल टाकलं आहे. विश्वासमताच्या लढाईत तिस-या आघाडीचं नेतृत्व त्यांच्याकडे चालत आलं आहे. त्यामुळे त्यांच्या नावाची तिस-या आघाडीच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवार म्हणून बुधवारी घोषणा होण्याची शक्यता आहेय.
रविवारी रजा न घेता राजधानीतील राजकारण्यांनी मोठ्या घडामोडी सुरूच ठेवल्या। त्यात यूएनपीए म्हणजे तिस-या आघाडीला मायावतींनी आपल्या पदरात घेतल्याचं स्पष्ट झालं. समाजवादी पक्षाच्या जाण्यामुळे लुळ्या झालेल्या तिस-या आघाडीत हत्तीचं बळ आलं. सरकार पाडणं हा एकमेव अजेंडा ठरवत मायावती आणि त्यांच्या पाठोपाठ डावे तिस-या आघाडीबरोबर एकत्र आले. शिवाय कालपर्यंत काँग्रेससोबत असलेल्या देवेगौडा आणि अजित सिंग यांनीही त्यांची साथ देण्याची घोषणा केली.
मात्र हे सगळं घडत असताना भाजप कुठेच दिसत नव्हतं. एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणींच्याकडे असणारं काँग्रेसविरोधाचं नेतृत्व मायावतींकडे सरकताना दिसत आहे. २३ तारखेला तिस-या आघाडीची बैठक होत असून त्यात मायावतींच्या नावाची पंतप्रधानपदाच्या उमेदवार म्हणून घोषणा होईल. मायावतींच्या प्रयत्नांमुळे मनमोहन सरकार पडलंच तर मायावती लगेचच पंतप्रधानपदाच्या बोहल्यावर उभ्या राहतील. अन्यथा त्या लोकसभेच्या निवडणुका होईपर्यंत काँग्रेसच्या नाकी नऊ आणतील.
जर असे घडले तर अडवाणींची पंतप्रधान बनण्याची स्वप्ने धूसर होऊ शकतात. मात्र मायावतींच्या नेतृत्वातील तिसरी आघाडी प्रत्यक्ष निवडणुकांत काँग्रेससाठी खूपच घातक ठरू शकते.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें