मुंबई - राज्यातील सर्व रेशनिंग दुकानांमधून दारिद्य्र रेषेखालील (बीपीएल) व दारिद्य्र रेषेवरील (एपीएल) कुटुंबांना स्वस्त दरात पाच किलो तांदूळ व एक लिटर पाम तेलाचा पुरवठा करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत।
त्यानुसार येत्या आठ- दहा दिवसांत रेशनिंग दुकानांमध्ये तांदूळ व खाद्य तेल उपलब्ध होईल, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री सुनील तटकरे यांनी दिली. एपीएल कार्डधारकांसाठी सात रुपये प्रतिकिलो दराने गहूही देण्याचा विचार आहे, असे त्यांनी सांगितले.
मार्च-एप्रिलमध्ये महागाईचा भडका उडाल्यानंतर विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात त्यावर मोठी चर्चा झाली। त्यावर राज्य सरकारने महागाईने त्रस्त झालेल्या जनतेला रेशनिंग दुकानांतून स्वस्त दरात तांदूळ, तूरडाळ व खाद्यतेल देण्याचा निर्णय घेतला; परंतु डाळ खरेदीच्या निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप झाल्याने तटकरे यांनी त्याला स्थगिती दिली व नव्याने निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले. त्यामुळे १ मेपासूनच रेशनिंग दुकानांमधून बीपीएलप्रमाणेच एपीएल कार्डधारकांना स्वस्त दरात धान्य व खाद्यतेल देण्याची योजना लांबणीवर पडली. आता हे "डाळ प्रकरण' न्यायालयात गेले आहे.
दरम्यान, अन्न व नागरी पुरवठा विभागाने रेशनिंग दुकानांमधून एपीएल कार्डधारकाला १२ रुपये प्रतिकिलो दराने पाच किलो तांदूळ आणि ४२ रुपये प्रतिलिटर दराने एक लिटर पाम तेलाचा पुरवठा करण्याचे आदेश काढले आहेत. त्यासाठी ७० हजार मेट्रिक टन तांदूळ व १८ हजार २०० मेट्रिक टन पाम तेल खरेदी करण्यात आले आहे, अशी माहिती तटकरे यांनी दिली. किमान आधारभूत किमतीवर प्रतिक्विंटल शंभर रुपये जादा मोजून राज्यातील शेतकऱ्यांकडून १० हजार मेट्रिक टन गहू खरेदी करण्यात आला आहे. शिवाय केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी राज्याला १० हजार मेट्रिक टन जास्तीचा गहू दिला आहे. राज्यात खरेदी केलेला गहू एपील कार्डधारकांना ७ रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध करून देण्याचा शासनाचा विचार आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडे तशी परवानगी मागण्यात येणार आहे, असे तटकरे यांनी सांगितले.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें