शुक्रवार, 4 जुलाई 2008

सिहांची शिकार, भारतीय संघ फायनलमध्ये

भारतीय संघाने भक्कम फलंदाजीच्या भरवशावर एकोणीस चेंडू शिल्लक ठेवून सहा गड्यांनी दणदणीत विजय प्राप्त करून आशिया करंडकाच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे। तडाखेबंद ६७ धावा करणाऱ्या धोनीस सामनावीराचा पुरस्कार बहाल करण्यात आला.
सलामीपासून प्रत्येक भारतीय फलंदाजाने धावा काढल्याने श्रीलंकेस तीनशे आठ धावांचाही बचाव करता आला नाही. श्रीलंकेकडडून फक्त मुरलीधरणने फलंदाजांवर जरब बसवली, मात्र इतर गोलंदाज निष्प्रभ ठरल्याने भारतीय संघाने सेहचाळीसाव्या षटकातच विजयी उद्दिष्ट गाठले.
श्रीलंकेने अगोदरच फायनलमध्ये प्रवेश केल्याने त्यांनी अनुभवी गोलंदाज चामिंडा वा व फिरकीपटू अजंता मेंडीस यांना विश्रांती देण्याच्या निर्णय भारताच्या पथ्यावरच पडला। भारताचे सलामीवीर गौतम गंभीर व विरेंद्र सेहवागने नेहमीप्रमाणेस भक्कम सुरूवात दिली.
गंभीरने धडाकेबाज अर्धशतक झळकवले तर सेहवागला अर्धशतकासाठी आठ धावा कमी पडल्या. त्यांनी पहिल्या गड्यासाठी ११.४ षटकात ९२ धावांची भक्कम आघाडी दिली. सेहवाग बाद झाल्यानंतर आलेल्या सुरेश रैनानेही ५४ धावांची सुरेख खेळी केली. वीस षटकात भारताच्या १३५ धावा फळ्यावर असताना गंभीर बाद झाला.
यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनी व सुरेश रैनाने सारख्या धावा काढत धावफलक हलता ठेवला. धोनीने ६७ धावांची भक्कम खेळी केली. त्यास मुरलीधरणने यष्टीचित केले. २३४ व २५३ धावांवर अनुक्रमे रैना व धोनी बाद झाल्यानंतर राहिलेल्या धावा काढण्याची औपचारिकता युवराज सिंग व रोहित शर्माने पूर्ण केली.

कोई टिप्पणी नहीं: