रविवार, 31 अगस्त 2008

पूरग्रस्‍तांसाठी मदतीचे हात सरसावले

नवी दिल्ली, ३१ ऑगस्ट-बिहारमध्‍ये कोसी नदीला आलेल्‍या महापुरामुळे मोठ्या अडचणींचा सामना करीत असलेल्‍या नागरिकांच्‍या मदतीसाठी देशभरातून मदतीचे हात सरसावले आहेत. नेते, अभिनेते, लष्‍करासह खेळाडूंनीही पूरग्रस्‍तांच्‍या मदतीसाठी सर्वतोपरी मदत करण्‍यास सुरूवात केली आहे. लष्‍कराच्‍या पश्चिम विभागातील जवानांना मदतकाया्रसाठी मुंबईहून बिहारला रवाना करण्‍यात आले आहे.
रेल्‍वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी रेल्‍वेच्‍या अधिका-यांना पूरग्रस्‍तांना रेल्‍वेच्‍या प्रवास भाड्यात सूट देण्‍याचे आदेश दिले आहेत. या सोबतच बिहारच्‍या रेल्‍वे स्टेशनांवर त्‍यांना फूड पॅकेट्सही उपलब्‍ध करून देण्‍यात आले आहेत.
महाराष्ट्र सरकारनेही मदत जाहीर केली असून मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी या कामासाठी २५ कोटी रुपयांची घोषणा केली आहे. तर हरियाणा सरकारने ५ कोटी देण्‍याचे आश्‍वासन दिले आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांनी भाजपची सत्‍ता असलेल्‍या राज्‍यातील मुख्यमंत्र्यांना पूरग्रस्‍तांच्‍या मदतीसाठी पुढे येण्‍याचे आवाहन केले आहे. तर भाजपने स्‍वतः त्‍यासाठी निधी उभारण्‍याचे प्रयत्‍न सुरू केले आहेत.
ऑलम्पिक पदक विजेता ‍अभिनव बिंद्रा आणि अभिनेता सुनील शेट्टी यांनीही पूरग्रस्‍तांसाठी मदतीची घोषणा केली आहे. बिंद्राने पूरग्रस्‍तांसाठी ५ लाख रुपये देण्‍याची घोषणा केली आहे. तर सुनील शेट्‍टी याने लोकांना बिहारच्‍या मदतीसाठी धावून जाण्‍याचे आवाहन केले आहे.
पतंजलि योग पीठातर्फे पूरग्रस्‍तांसाठी दोन कोटी रुपयांचे औषधे आणि अन्‍नधान्‍य देण्‍याची घोषणा करण्‍यात आली आहे.

कोई टिप्पणी नहीं: