शुक्रवार, 22 अगस्त 2008

सरकारच्या नाकर्तेपणामुळेच मराठी माणसावर अन्याय - राज ठाकरे

उस्मानाबाद, २२ ऑगस्ट - सरकार व विरोधीपक्ष यांच्या नाकर्तेपणामुळेच महाराष्ट्रात मराठी माणसावर अन्याय केला जात आहे, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.
उस्मानाबाद जिल्ह्यातील पक्षाचे आजी, माजी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी लातूरहून तुळजापूरला जात असताना राज ठाकरे यांचे गुरुवारी (ता। २१) येथे शिवाजी पुतळ्याजवळ मनसेनेच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांची संख्या पाहून तेथेच ठाकरे यांनी जाहीर सभा घेतली.
मराठवाड्यात पक्ष संघटना बांधणीसाठी मी दौऱ्यावर आलो आहे या दौऱ्यात कोठेही जाहीर सभा घेणार नाही, असे ठरविले होते, परंतु कार्यकर्त्यांनी दाखविलेले प्रेम लक्षात घेऊन सभा घ्यावी लागत आहे, असे स्पष्ट करून ठाकरे म्हणाले "लाखो मराठी तरूण बेरोजगार असताना परप्रांतीय मंडळी महाराष्ट्रात येऊन काम हिसकावून घेत आहेत। परप्रांतियाचे हे आक्रमण आपण किती दिवस सहन करायचे. परप्रांतियांना मी विरोध करतो म्हणजे देशाचे विघटन करीत आहे अशी टीका काही मंडळी करतात. भारतीय रेल्वे सर्व देशाची आहे पण नोकऱ्या देताना तेथे बिहारी व उत्तर प्रदेशातील लोकांना प्राधान्य दिले जाते हा समान विचार आहे का? असा सवाल करून ठाकरे यांनी महाराष्ट्रात उपलब्ध नोकऱ्याही मराठी तरूणांना मिळू द्यायच्या नाहीत हा या मागचा कट असल्याचा आरोप केला.
परप्रांतीय येऊन अनधिकृत झोपडपट्टी उभी करतात आपले सरकार मात्र अशा झोपडपट्टीवासीयांना २२५ चौरस फुटांचे घर मोफ त देते। मात्र राब राब राबणाऱ्या राज्यातील पोलिसांना घरे मिळू शकत नाहीत, अशी टीका करून राज ठाकरे यांनी मराठी माणसावर अन्याय होत असेल तिथे लाथ मारा, सतत जागता पहारा द्या, असे आवाहन केले.
ठाकरे यांच्यासोबत आमदार बाळा नांदगावकर, सरचिटणीस प्रविण दरेकर, शिरीष पारकर, बंटी मंजूळे, दिनेश देशमुख, सुनिल शिंदे, हेमंत पाठक आदी कार्यकर्ते होते. प्रारंभी सौ. निलाबाई विठ्ठल मंजूळे यांनी ठाकरे यांना औक्षवण केले. सायकलच्या साह्याने व्यायाम करीत वीज निर्मितीचा प्रयोग करणारा कळंब येथील युवक मधुकर बाबर याचा यावेळी ठाकरे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
ठाकरे यांचे आगमन होताच फटाक्‍यांची प्रचंड आतिषबाजी करीत ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. ठाकरे उस् मानाबादेत केवळ स्वागत स्वीकारणार, असे जाहीर झाले असताना शिवाजी चौकात प्रचंड संख्येने तरूणवर्ग जमला होता हे पाहून त्यांनी भाषण केले.

कोई टिप्पणी नहीं: