मुंबई, २३ जुलै-गोपीनाथ मुंडे यांचे विश्वासू आणि यवतमाळचे विद्यमान खासदार हरिभाऊ राठोड यांना भाजप नेतृत्वाने त्यांच्या ‘ गद्दारी ’ ची सजा दिलीय. लोकसभेत विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी नेमके गैरहजर राहणारे खा. राठोड यांना भाजपमधून निलंबित करण्यात आलेय. दरम्यान, आपणाला काँग्रेस, राष्ट्रवादी, बसपसह अनेक पक्षांकडून ऑफर असल्याचे राठोड यांनी स्पष्ट केलेय.
विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेच्या वेळी दिवसभर हरिभाऊ राठोड लोकसभेत हजर होते। परंतु मतदानाच्या निर्णायक वेळेआधीच ते सभागृहातून बाहेर निघून गेले, ते पुन्हा लोकसभेत आलेच नाहीत. मतदानाच्या वेळी गैरहजर राहून त्यांनी एकप्रकारे काँग्रेसप्रणित यूपीए सरकारला मदतच केल्याचा ठपका त्यांच्यावर आला आहे. या गैरहजेरीची पुरेपूर ‘ किंमत ’ त्यांनी वसूल केल्याची चर्चा दिल्लीत आहे.
विशेष म्हणजे राठोड यांच्या या गद्दारीमुळे गोपीनाथ मुंडे चांगलेच अडचणीत आले आहेत। राठोड हे बंजारा समाजाचे असून, मुंडे यांच्या गोटातील आहेत. मुंडे उपमुख्यमंत्री असताना ते त्यांचे स्वीय सहाय्यक होते. मुंडेंच्याच शिफारशीवरुन त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली व यवतमाळमधून ते खासदार म्हणून निवडूनही आले. परंतु लोकसभा मतदारसंघ फेररचनेत त्यांचा यवतमाळ मतदारसंघ वाशिममध्ये विलीन झाला आहे. तेथून शिवसेनेच्या भावना गवळी खासदार असल्याने युतीच्या जागावाटपात तो मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला जाणार आहे. परिणामी राठोड यांना काहीही आसरा न उरल्याने त्यांनी जाता जाता स्वतःचा राजकीय आणि आर्थिक फायदा करुन घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा बसपकडून आगामी लोकसभा निवडणूक वाशिममधून लढवण्याची त्यांची इच्छा असल्याचे समजते. त्यापैकी राष्ट्रवादीचा पर्याय ते निवडतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, हरिभाऊ राठोड यांनी मात्र आपल्यावरील गद्दारीच्या आरोपांचा इन्कार केला आहे। माझी प्रकृती अचानक बिघडल्याने मतदानाच्या वेळी हजर राहू शकलो नाही. मला हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले. आयसीयूमध्ये मोबाईल फोन वगैरे काढून घेतल्याने मला पक्ष नेतृत्वाशी संपर्क साधता आला नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. आपण सभागृहात हजर असता तर कुणाला पाठिंबा दिला असता, अशी विचारणा केली असता, नक्की सांगता येणार नाही. परंतु मनमोहन सिंग यांचे सरकार पडता कामा नये, अशी आपली मनापासून इच्छा होती, असे धक्कादायक वक्तव्य त्यांनी केले. कालपासून मला अनेक पक्षाच्या नेत्यांनी फोन केलेत. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि बसपचे नेतेही संपर्कात असून, त्यांनी मला पक्षात येण्याची ऑफर दिली आहे, असा खुलासाही राठोड यांनी यावेळी केला.
मतदानाच्या वेळी गैरहजर राहणारे हरिभाऊ राठोड आणि तुकाराम रेंगे पाटील यांची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व मुंडे विरोधक नितीन गडकरी यांनी केली आहे. मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी त्या दोघांनाही लक्ष्मीदर्शन केले. त्यांचे फोन रेकॉर्डस् चेक करावेत, अशी मागणी करतानाच बेइमान, विश्वासघातकी राठोड यांना पक्षात ठेवणार नाही, अशी तिखट प्रतिक्रियाही गडकरी यांनी व्यक्त केली.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें