शनिवार, 4 अक्टूबर 2008

पाकिस्‍तान नवे युद्ध क्षेत्र

इस्लामाबाद, ४ ऑक्टोबर- आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस कमीटीने पाकिस्तान हे नवे युद्ध क्षेत्र असल्‍याचे घोषित केले आहे.
रेडक्रॉसचे प्रवक्ते मार्कोसोई यांनी एका अमेरिकन वृत्‍तपत्राला दिलेल्‍या मुलाखतीत पाकिस्तान हे जगाचे नवे युध्‍द क्षेत्र असल्‍याचे म्‍हटले आहे. पाकमध्‍ये नुकत्‍याच झालेल्‍या स्फोटांनंतर आणि पाकच्‍या उत्तर भागात पसरलेल्‍या अशांततेनंतर पाकिस्‍तान युध्‍दक्षेत्र म्‍हणून घोषित केले गेले आहे.
या भागात आतापर्यंत 20 हजारापेक्षाही जास्‍त लोक बेघर झाले आहेत. तर पाक सैन्‍य आणि तालिबानींमध्‍ये झालेल्‍या संघर्षात हजारो जणांना प्राण गमवावे लागले आहे.

गुरुवार, 2 अक्टूबर 2008

अमेरिकी काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांमध्ये करार मंजूर झाला

वाशिंगटन, २ ऑक्टोबर - उलट-सुलट प्रश्न उपस्थित झाले, चर्चा रंगली, जरासे खटकेही उडाले, बराच खल झाला... पण अखेर, भारत-अमेरिका नागरी अणुकसहकार्य कराराला अमेरिकी सिनेटमध्ये मान्यता मिळाली. अणुकराराच्या बाजूने ८६ मतं मिळाली, तर १३ जणांनी कराराला आपला विरोध दर्शवला. काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांमध्ये करार मंजूर झाला असल्यानं आता राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश, आपल्या कारकिर्दीतल्या शेवटच्या महिन्यात या महत्त्वपूर्ण करारावर स्वाक्षरी करतील.
अमेरिकेच्या ' हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हने ' तीन दिवसांपूर्वी या कराराला मान्यता दिली होती. भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवारी संध्याकाळी हा करार सिनेटमध्ये सादर झाला. त्यानंतर त्यावर जोरदार चर्चा रंगली. त्यात प्रमुख विषय होता, तो भारतानं अणुकरार केल्यास काय होईल, अमेरिका कोणती पावले उचलणार, याबद्दल अनेक सदस्यांनी विचारणा केली. जेफ बिंगमॅन आणि डॉर्गन यांनी दुरुस्त्या सुचवल्या.
त्यावर, भारतानं अणुचाचणी केल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील, असं अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री कोंडोलिझा राईस यांनी स्पष्ट केलं. त्यांना मिळणारं अणुइंधन, तंत्रज्ञान आणि रिअॅक्टरची परवानगी काढून घेण्याची कारवाई होईल, असं त्यांनी सांगितलं. त्यावरही बरेच उलटसुलट प्रवाद समोर आले, पण मतदानावेळी अपेक्षेप्रमाणे अणुकरार संमत झाला. त्यामुळे भारत-अमेरिकेदरम्यानच्या अणुव्यापारावरील तीन दशकांपासूनचे निर्बंध संपुष्टात आले आहेत.
अणुकराराला अमेरिकेच्या दोन्ही सभागृहांची मान्यता मिळाल्यानं आता शनिवारी कोंडोलिझा राईस भारतभेटीवर येऊन परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर, जॉर्ज बुश या करारावर स्वाक्षरी करतील आणि अणुऊर्जेच्या क्षेत्रात एक नवा अध्याय सुरू होईल.

बुधवार, 1 अक्टूबर 2008

अगरतळ्यात ५ स्‍फोट, २ ठार, ३० जखमी

अगरतळा, १ अक्टोबर-त्रीपुराची राजधानी अगरतळा शहरातील पाच गजबजलेल्‍या भागात बुधवारी सायंकाळी ७.३० वाजेच्‍या सुमारास झालेल्‍या ५ स्‍फोटात २ जण ठार सुमारे ३० जण जखमी झाले आहेत. कमी तीव्रतेच्‍या या स्‍फोटामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अगरतळा शहरातील गुडबाजार, राधानगर बसस्‍थानक, एम.जी.बाजार व जी.बी.हॉस्पिटल परिसरात स्‍फोट झाला. दिल्‍लीत झालेल्‍या स्‍फोटांशी या स्‍फोटांचे साम्‍य असून गर्दीच्‍या ठिकाणी हे स्‍फोट घडवून आणण्‍यात आला आहे. बसस्‍थानक परिसरात 2, उद्यान, बाजार व रुग्‍णालयाच्‍या परिसरात १ स्‍फोट झाला आहे.

राज ठाकरेंना अटक करण्‍याचे आदेश

जमशेदपूर, १ ऑक्टोबर- उत्‍तर भारतीय आणि बिहारीच्‍या छठ पर्व उत्‍सवाबद्दल वादग्रस्‍त वक्‍तव्‍य केलयाबद्दल झारखंडच्‍या एका न्‍यायालयाने राज ठाकरे यांना अटक करून न्‍यायालयात हजर करण्‍याचे आदेश बजावले आहेत.
मुंबईच्‍या पोलीस आयुक्‍तांच्‍या नावे बजावलेल्‍या या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना अटक करण्‍याचे आदेश देण्‍यात आले आहेत.
न्याय दंडाधिकारी ए. के. तिवारी यांनी राज यांना अटक करून १७ नोव्‍हेंबरपर्यंत अटक करण्‍याचे आदेश दिले आहेत. न्‍यायालयाने त्‍यासाठी राज यांच्‍या विरोधात अजामीनपात्र वॉरंटही बजावले आहे. येथील एक वकील हमीद रजा यांनी राज यांच्‍या विरोधात उत्तर भारतीय आणि बिहारी लोकांच्‍या छठ पूजेविरुध्‍द वादग्रस्‍त वक्‍तव्‍य केल्‍याचा आणि हिंसा पसरविल्‍याचा आरोप करून खटला दाखल केला आहे.

मंगलवार, 30 सितंबर 2008

शिवरायांचे गुरू दादोजी कोंडदेवच

पुणे, ३० सप्टेम्बर- छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू दादोजी कोंडदेव होते, हे सांगणारे इतिहासात अनेक पुरावे उपलब्ध असल्याचा दावा इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, गजानन मेहेंदळे आणि निनाद बेडेकर यांनी सोमवारी केला। शहाजी राजांच्या नावे पुरस्कार देण्याचा निर्णय स्वागतार्ह असला, तरी आधीच्या पुरस्कारातून दादोजी कोंडदेव यांचे नाव काढून टाकणे गैर आहे. ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू होते का नव्हते, हे निष्कर्ष पुरस्कारासाठी लावणे चुकीचे असल्याचे मत त्यांनी मांडले आहे.
काही मोजक्या व्यक्ती आणि संघटनांच्या दडपणाखाली सरकारने समिती नेमली असून त्यांच्या अभ्यासावर आधारित चुकीचे निर्णय सरकार घेत असल्याची टीका बलकवडे यांनी केली. वेगवेगळ्या विद्यापीठाच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमातही शिवाजी महाराजांना दादोजी कोंडदेव यांनी शिकवल्याचे उल्लेख असून त्याकडे समितीने दुर्लक्ष केल्याचे ते म्हणाले. हा एक प्रकारचा सांस्कृतिक दहशतवाद असल्याचा आरोपही त्यांनी केला. सरकारने नेमलेल्या अभ्यास समितीत परस्परच नेमणूक केली असून आपल्याला याबद्दलची माहिती वृत्तपत्रातूनच कळाली असल्याचे मेहेंदळे आणि बेडेकर यांनी स्पष्ट केले. याबाबतचे कोणतेही लेखी पत्र किंवा साधा फोनही अधिकृतरित्या केला नसल्याचे ते म्हणाले. या समितीत १५ अभ्यासक असून यातल्या १० जणांना इतिहासातले काहीही कळत नसल्याचे बेडेकर यांनी नमूद केले. ज्यांना फारसी, मोडी आणि पशिर्यन येत नाही ते कसले अभ्यासक असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
सरकार संशोधनात जातीयवाद आणत असून दादोजी कोंडदेव ब्राह्माण होते म्हणूनच त्यांचे नाव बाजूला करण्याचा घाट काही संघटना आणि व्यक्तींनी घातला असल्याचे मेहेंदळे म्हणाले. या सर्व घटनांचा संशोधनावर परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले.


चामुंडादेवी चेंगराचेंगरी प्रकरणी चौकशीचे आदेश

जोधपूर, ३० सप्टेंबर- राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी चामुंडादेवी चेंगराचेंगरी कांडानंतर चौकशीचे आदेश दिले असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे.
जखमींनी प्रत्येकी पन्नास हजार रूपयांची मदत देण्यात येईल. राजे यांनी मेहरनगढ भागातील घटनास्थळी भेट दिल्यानंतर अतिरिक्त मुख्य सचिव दर्ज्याच्या अधिकाऱ्यास चौकशी सोपवण्यात येणार असल्याचे सांगितले.
कॉंग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी याप्रकरणी न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे.

मालेगांव बळींना सरकारची मदत जाहीर

मुंबई, ३० सप्टेंबर- महाराष्ट्र सरकारने मालेगाव बॉम्बस्फोटात बळी पडलेल्यांच्या नातेवाईकांना पाच लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे. गंभीर जखमींना पन्नास हजार तर तुरळक जखमींना पंचवीस हजार रूपयांची मदत देण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री विलासराव देशमुख युरोपच्या दौऱ्यावर असून स्फोटात जखमी झालेल्या पोलिसांना आर्थिक साहाय्य उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. मालेगावात काल रात्री वर्दळीच्या भिक्कू चौक भागात झालेल्या बॉम्बस्फोटात चार जणांचा बळी गेला तर सत्तर जण जखमी झाले आहेत.