सोमवार, 1 सितंबर 2008

भाजी विक्रेत्यांवरील कारवाईमुळे साताऱ्यात तणाव

सातारा, १ सप्टेम्बर- शहरातील एकत्रित भाजी मंडईच्या विरोधात असलेल्या आणि जुन्या भाजी मंडईत भाजी विक्री करणाऱ्या पाच जणांवर सोमवारी पालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाने कारवाई केली. या भाजी विक्रेत्यांचे सामान आणि भाजीपाला जप्त केल्यानंतर त्यांनी नवीन भाजीपाला आणून रस्त्यावर ओतून दिला.
पालिकेच्या अधिकाऱ्यांनी नवीन भाजीपाला जप्त करण्याची कारवाई सुरू केल्यानंतर काही महिला भाजी विक्रेत्या आणि महिला पोलिस कर्मचारी यांच्यात धक्काबुक्की झाली. त्यातच लक्ष्मीबाई चाळके नावाची एक महिला बेशुद्ध पडल्याने तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या सर्व प्रकारामुळे सोमवारी सकाळी या भागात काही वेळ तणाव निर्माण झाला होता.
शहरात जुन्या भाजी मंडईपासून अवघ्या दहा पावलांवर नगरपालिकेने नवीन "महात्मा फुले भाजी मंडई' बांधली आहे। काही भाजी विक्रेत्यांचा त्याला विरोध आहे. त्यांनी सोमवारी सकाळी जुन्या भाजी मंडईतच विक्री करण्यास सुरवात केली. त्यानंतर आठ वाजताच नगरपालिकेचे अधिकारी पोलिसांच्या फौजफाट्यासह घटनास्थळी पोचले आणि त्यांनी सामान जप्त करण्यास सुरवात केली.
या कारवाईचा भाजी विक्रेत्यांनी निषेध केला आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी भाजीपाला जप्त करण्याआधी पंचनामे केले नसतील, तर त्यांच्यावर चोरीचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी विक्रेत्यांच्या वतीने ऍड. वर्षा देशपांडे यांनी केली.

कोई टिप्पणी नहीं: