शुक्रवार, 15 अगस्त 2008

पंतप्रधानांच्या भाषणावर अडवाणी नाराज

नवी दिल्ली, १५ अगस्ट - संसद सदस्यांना लाच देण्याच्या प्रकरणाचा उल्लेख स्वातंत्र्यदिन सोहळ्यातील भाषणात पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी न केल्याबद्दल भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी आज (शुक्रवारी) तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. "या लाचखोरी प्रकरणामुळे लोकशाहीवरील विश्‍वासाला तडा केला आहे. हीच परिस्थिती आणीबाणीच्या काळात होती,' असे अडवाणी यांनी म्हटले आहे.
"दोनवेळा लोकांचा लोकशाहीवरील विश्‍वास डळमळीत झाला। पहिल्यांदा १९७५ मध्ये. जेव्हा, घटनात्मक अधिकारांचा दुरुपयोग करून आणीबाणी लादण्यात आली. तो स्वतंत्र भारताच्या इतिहासावरील डाग आहे. यावर्षी दुसरा डाग पडला. आपण आतापर्यंत निवडणुकांमध्ये पैशाचा वापर होत असल्याची तक्रार करीत होतो, तथापि, यावेळी थेट संसदेवर प्रभाव पाडण्यासाठी धनशक्तीचा वापर झाला,' अशी टीका अडवाणी यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
ते म्हणाले, "पंतप्रधान आपल्या भाषणात या प्रकरणाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष उल्लेख करतील, अशी मला अपेक्षा होती. अमरनाथ वादाचा उल्लेख त्यांनी केला असला, तरी याप्रकरणाचा उल्लेख करणे अत्यावश्‍यकच होते.'

कोई टिप्पणी नहीं: