बुधवार, 20 अगस्त 2008

लातूरची ओळख हरित जिल्हा व्हावी

लातूर, २० अगस्ट-राष्ट्रीय हरित सेनेतील विद्यार्थ्यांनी घराच्या परिसरात, गावात, आणि शेतात वृक्षारोपण करावे तसेच जिथे मोकळी जागा आहे त्या ठिकाणी वृक्षारोपण करुन लातूर जिल्ह्याची ओळख हरित जिल्हा म्हणून निर्माण करण्यासाठी नियोजनबध्द रीतीने सामाजिक वनीकरण विभागाने काम करावे, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्वातंत्रदिनी आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात केले।
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात पालकमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते। या वेळी सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक सी. एम. धारणकर यांनी जिल्ह्यातील वनीकरणाची माहिती देताना सांगितले की, लातूर जिल्ह्यात ७ हजार ३८० झाडे गायरान जमिनीवर, तर २ हजार १३५ झाडे खासगी जमिनीवर, आणि ५८० किलोमीटर रस्त्यावर झाडे लावण्यात आलेली आहेत. २००८ या वर्षात आणखी ३७५ हेक्टर जमीनीवर झाडे लावण्याचे उद्दिष्ट असून जिल्ह्यात साडेबारा लाख रोपांची लागवड करण्याचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सामाजिक वनीकरण विभागातफेर् दहा लाख रोपं लावण्याचे उद्दिष्ट असून जिल्ह्यात सध्या ४५ जातींची पाच लाख झाडे उपलब्ध आहेत.
यावेळी नगराध्यक्ष अॅड. व्यंकट बेदे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. त्रिंबकदास झंवर, जिल्हाधिकारी एकनाथ डवले यांच्या हस्तेही वृक्षारोपण करण्यात आले.

कोई टिप्पणी नहीं: