नाशिक, २० अगस्ट-हिरे-सोने चोरीचा परस्पर तपास करून हाती आलेला ऐवज स्वत:च हडप केल्याचा आरोप असलेल्या अंबड पोलिस ठाण्यातील तत्कालिन निरीक्षक बाबासाहेब बुधवंत यांच्यासह चार पोलिस कर्मचाऱ्यांच्या पोलिस कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्यात आली आहे.
या पाच कर्मचाऱ्यांनी जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून अटकपूर्व जामीन मिळविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सुप्रीम कोर्टाने जामीन फेटाळून त्यांच्या या प्रयत्नांना पूर्णविराम दिला होता. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. बुधवंत यांच्यासह पोलिस शिपाई राजेंद नगरकर, बाळू वाघ, कैलास थेटे व विठ्ठल माळी यांच्याविरुध्द जुलैच्या पहिल्या आठवड्यात अंबड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तीन महिन्यांपूवीर् कुरिअरच्या माध्यमातून शहरातील एका सराफाने हिरे, कच्चे सोने व सोन्याचे दागिने असा सुमारे २५ लाखांचा ऐवज मागविला होता। कुरिअर घेऊन येणारा ट्रक जकात भरण्यासाठी विल्होळी नाक्यावर थांबल्यावर हिरे व सोन्याचे पाकिट ट्रकमधून चोरीस गेले होते. या प्रकरणी तक्रार नोंदवून न घेता अंबड पोलिसांनी परस्पर तपास केला होता.
तपासादरम्यान तीन संशयितांना ताब्यात घेतले व खासगी गाडीतून संगमनेर गाठून चोरीस गेलेला ऐवज हस्तगत केला. पुढील कायदेशीर प्रक्रियेला फाटा देत त्यातील निम्मा ऐवज स्वत:च हडप केला होता. त्यानंतर २८ मे रोजी दाखल केलेल्या तक्रारीत केवळ १० लाखाचा ऐवज चोरीला गेल्याचे नोंदविण्यात आल्याचा आरोप या पाचही संशयितांवर ठेवण्यात आला आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें