मुंबई, १८ सप्टेम्बर-विदर्भाला नवी ओळख मिळवून देऊ शकणा-या ' मिहान ' सारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात मराठी माणसाला योग्य स्थान मिळायलाच पाहिजे, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन पुकारेल, असा इशारा अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे.
आज नागपुरातून राज ठाकरे यांचा विदर्भ दौरा सुरू झाला. त्यात राज यांनी सुरुवातीला, जागतिक दर्जाच्या मिहान प्रकल्पाची माहिती घेतली. नागपूरसह विदर्भाच्या सर्वांगीण विकासाची सुवर्णसंधी म्हणून मिहानकडे बघण्यात येत आहे. त्यातून नागपूरच्या अर्थकारणाला गती मिळणार आहे, कारण या प्रकल्पांतर्गत माहिती-तंत्रज्ञान, आरोग्य, शैक्षणिक, उद्योग, सेवा उद्योग, आयात-निर्यात क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जातेय. तसंच आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे होणारी उलाढाल अवाढव्य असेल. त्यामुळे सुमारे चार लाख रोजगार उलपब्ध होणार आहेत.
मिहान प्रकल्पातल्या रोजगारांमध्ये मराठी माणसाला प्राधान्यानं स्थान मिळालं पाहिजे, असे राज यांनी ठणकावून सांगितले। तिथेही जर आम्हाला डावललं गेलं तर मनसे हा अपमान सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. दौ-याच्या पहिल्याच दिवशी राज यांनी मराठीचा मुद्दा उपस्थित केल्यानं, हा दौराही गाजणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.
हा दौरा २३ तारखेपर्यंत चालणार आहे. विशेष म्हणजे, खैरलांजी हत्याकांडातील आरोपींना २० तारखेला शिक्षा सुनावली जाणार असताना, राज ठाकरे भंडा-यातच आहेत.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें